श्रीगोंदा – तालुक्यातील सांगवी दुमाला येथे भीमा नदीपात्रातून तब्बल आठ ते दहा यांत्रिक बोटींद्वारे दिवसाढवळ्या वाळूउपसा केला जात आहे. येथील एका वाळूतस्करावर महसूल अधिकाऱ्यांची विशेष ‘मेहरबानी’ असल्याने तो खुलेआम वाळूउपसा करत आहे. त्यामुळे अवैध वाळूतस्करी विरोधात सर्व विभागांनी संयुक्त मोहीम राबवणे गरजेचे आहे.
श्रीगोंद्यात वाळूतस्करी नवीन नाही. वाळूतस्करांचे महसूल, पोलीस आणि वन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याने वाळूतस्कर बिनदिक्कतपणे अवैध वाळूउपसा करीत आहेत. अवैध वाळूतस्करीबाबत दररोज गावगावांमधून येणाऱ्या तक्रारींकडे प्रशासनाकडून सोयीस्कररित्या डोळेझाक केली जाते. तालुक्यातील राजापूर, माठ, दाणेवाडी, काष्टी, सांगवी दुमाला, आर्वी, वांगदरी आदी ठिकाणी होणाऱ्या वाळूतस्करीविरोधात आवाज उठवणे देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.
अवैध व्यवसायातून बक्कळ पैसा मिळत असल्याने हे वाळूतस्कर गावोगावी ‘दादा’ झाले आहेत. या तस्करांनी नदी पट्ट्यात दहशत निर्माण केली आहे. त्यातच प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी देखील तस्करांना ‘मॅनेज’ असल्याने सगळे काही आलबेल असल्याचे भासवले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सांगवी दुमाला येथे भीमा नदी पात्रातून जवळपास आठ ते दहा यांत्रिक बोटींद्वारे खुलेआम वाळूउपसा केला जात आहे. त्याचबरोबर अनेक जेसीबी यंत्र देखील वाळूउपसा करीत आहेत. गावातून आणि नगर-दौंड महामार्गावरून या वाहनांची ये-जा असताना ही महसूल अथवा पोलीस प्रशासनाला याची खबर मिळत नाही, हे विशेष.
महसूल विभागासह वन विभागाच्या हद्दीतून देखील खुलेआम वाळू उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे वाळूतस्करी आता दिवसाढवळ्या होत आहे. त्यातच, थेट प्रशासनच ‘मॅनेज’ असल्याने वाळूतस्करांची ‘दादागिरी’ देखील वाढली आहे. तालुक्यातील वाळूतस्करी विरोधात महसूल, पोलीस आणि वन विभागाने धडक कारवाई मोहीम सुरू करणे गरजेचे बनले आहे.