मुंबई पोलिसांची पाचावर धारण; दहशतवाद विरोधी पथक, पोलिसांकडून शोधमोहीम सुरु
मुंबई : जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जामीनावर बाहेर आलेला कुख्यात दहशतवादी डॉ. जलील अन्सारी फरार झाल्याने मुंबई पोलिसांची पाचावर धारण बसली आहे. पोलिस आणि दहशतवादी प्रतिबंधात्मक पथक त्याचा कसून शोध घेत आहे.
राजस्थानातील अजमेर कारागृहात अन्सारी आजन्म कारावासाची शिक्षा भोगत होता. त्याला त्याच्या मुंबईतील नातेवाईकांना भेटण्यासाठी जामीन सर्वोच्च न्यालयाने मंजूर केला होता. तो शुक्रवारी सकाळी (दि. 17) कारागृहात पोहोचणे अपेक्षित होते.
डॉ, बॉम्ब अशी ओळख बनलेला अन्सारी 90 च्या दशकात देशातील सुमारे 50 बॉम्बस्फोटात सहभागी होता. गुरुवारी तो नमाज पठण करायला पहाटे पाच वाजता गेला. त्यानंतर त्याचा तपास लागत नाही अशी तक्रार त्याच्या कुटुंबियांनी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात काल दाखल केली. ही तक्रार दाखल होताच मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशार देत महाराष्ट्र दहशतवादी प्रतिबंधात्मक पथक आणि यंत्रणांना त्याची माहिती दिली. त्यानंतर व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली.
व्यवसायाने डॉक्टर असणारा अन्सारी बृहनमुंबई महापालिकेत एके काळ किार्यरत होता. पाकिस्तानात त्याने 90मध्ये दहशतवादाचे आणि स्फोटके हाताळण्याचे आणि बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्याला जयपूर आणि मालेगाव बॉम्बस्फोट मालिकेत दोषी ठरवण्यात आले. त्यात त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
पुणे, मुंबई, हैदराबाद, आणि अन्य ठिकाणच्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता, असे पोलिस तपासात आढळून आले आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या कृतीचा बदला म्हणून तो बॉम्नस्फोट घडवत असे.
कुख्यात दहशतवादी अब्दूल करीम टुंडा याच्या प्रभावातून अन्सारी दहशतवादाकडे वळला. तो टायमर डिव्हाईस आणि टीएनटी बॉम्ब बनवण्यातील तज्ज्ञ आहे. इंडियन मुजाहिद्दीन, हरकत उल जिहादी अल-इस्लामी यांचे दहशतवादी मॉडेल आणि त्यांचे जाळे विस्तारण्यात त्याचा मोठा सहभाग होता, हे पोलिसांच्या काळजीत भर घालण्याचे कारण आहे.