महाबळेश्वर – शहराच्या मुख्य बाजारपेठेतील दोन्ही बाजूकडील दुकानांचे रस्त्यापर्यंत आलेले कच्चे पक्के बांधकाम हे अतिक्रमण असून ते तोडण्याचे तोंडी आदेश महाबळेश्वर पाचगणी वारसा स्थळ जतन समितीने पालिकेला दिले आहेत. या वृत्ताने शहरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट पसरली आहे. समितीच्या भूमिकेला शहरातून तीव्र विरोध केला जात आहे. या संदर्भात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून महाबळेश्वर हे शहर प्रसिध्द आहे. येथील पर्यावरणामुळे महाबळेश्वरचे महत्त्व टिकून आहे येथील पर्यावरणाचे रक्षण करून संवर्धन करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक समित्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या पैकीच एक म्हणजे वारसा स्थळ जतन समिती होत. महाबळेश्वर येथे अनेक ऐतिहासिक व ब्रिटीश कालीन वास्तू आहेत. त्यांचे जतन करण्यासाठी या समितीने वारसा स्थळांचा दर्जा लक्षात घेवून यादी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार महाबळेश्वर येथील बाजारपेठ ही वर्ग तीनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
त्यामुळे बाजारपेठेत बांधकाम करताना या समितीचे ना हरकत पत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या समितीकडून अशा प्रकारचे ना हरकत पत्र घेण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधीही लागतो. मात्र धनिकांना तातडीने असे ना करहकत पत्र उपलब्ध होते, असा आरोप शहरतून केला जात आहे. या समितीने आता शहरातील अतिक्रमणाकडे आपले लक्ष दिले आहे. डॉ. साबणे रोडच्या दोन्ही बाजूला बाजारपेठ वसली आहे. या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूला दोन मुख्य चौक आहेत.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आहेत. या सर्व मिळकतीच्या सर्व कागदपत्रांवर रस्त्यापासून चार फूट जागेवर वृक्ष लागवडीसाठी पालिकेचे आरक्षण ठेवण्यात आल्याची नोंद आहे. या चार फुटात पूर्वी अनेक वृक्ष होते. परंतु हळूहळू असे वृक्ष तोडून ओटे करण्यात आले. या ओट्यावर पक्की बांधकामे करून अनेकांनी आपली दुकाने थाटली आहेत. हा बदल काही एका वर्षात झाला नाही.
गेली 40 वर्षात हा बदल घडलेला आहे. याबाबत समितीला आत्ता जाग आली आणि त्यांनी डिसेंबरमध्ये झालेल्या बैठकीत डॉ. साबणे रोडच्या दोन्हा बाजूला चार फूट अतिक्रमण तोडण्याची कारवाई करण्याचे तोंडी आदेश पालिकेला दिले आहेत. या संदर्भात पालिकेची भूमिका ठरविण्यासाठी सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात येणार आहेत
पालिकेच्या भूमिकेकडे शहरवासीयांचे लक्ष
समितीच्या आदेशाची कारवाई पालिकेने करू नये अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व अर्बन बॅंकेचे अध्यक्ष राजेश कुंभारदरे यांनी केली आहे. ते म्हणाले बाजारपेठेत एकही वारसा स्थळ किंवा ऐतिहासिक बांधकाम नाही, असे असताना हेरिटेज समितीने बाजारपेठेचा समावेश हेरिटेज यादीत केला. गेली अनेक वर्षे या यादीतून बाजारपेठ वगळण्यात यावी अशी मागणी शहरवासियांकडून सातत्याने केली जात आहे.
परंतु या मागणीकडे दुर्लक्ष करून समितीने बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याची भूमिका घेतली आहे. समितीची ही मनमानी आम्ही खपवून घेणार नाही, शहर उद्ध्वस्त करू पहात असलेली समितीच बरखास्त करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असून समितीने जर मनमानी करून हा निर्णय शहरावर लादला तर वेळप्रसंगी आम्ही बेमुदत शहर बंद आंदोलन सुरू करू असा इशाराही राजेश कुंभारदरे यांनी दिला. दरम्यान उद्या होत असलेल्या सर्वसाधारण सभेत पालिका कोणती भूमिका घेणार? याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.