जेएनयू विद्यार्थ्यांवरील हल्ल्याबाबत ट्विट करत साधला निशाणा
मुंबई – देशभरातून “का’ला विरोध होत असून याविरोधात अनेक विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरत आहेत. त्यातच दिल्लीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मोदी सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. याचाच संदर्भ घेत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर ट्विट करून टीकास्त्र सोडले आहे.
“तुमने जिस खून को मक्तल में दबाना चाहा, आज वह कूचा-ओ-बाजार में ओ निकला है. जय हिंद!’, असे ट्विट करत संजय राऊत यांनी सरकारला खडेबोल सुनाविले आहे. या माध्यमातून त्यांनी जेएनयू आणि देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांवर सरकार घेत असलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
“जे रक्त तुम्ही कत्तलखान्यात लपवण्याचा प्रयत्न केला, ते आज रस्त्यावर आले आहे’, असा या शेरचा मतितार्थ असून, जेएनयू व इतर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. पण, तरुण व नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शेर ट्विट करण्यापूर्वी त्यांनी “तुम्ही सरकारवर प्रेम न करताही देशावर प्रेम करू शकता’ हे थॉमस गोम्स यांचे वाक्य ट्विट केले आहे. हे ट्विट करून त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.