इंदूर : सलामीवीर फलंदाज शिखर धवन व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीवर आज येथे होत असलेल्या भारत व श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात लक्ष राहणार आहे. गुवाहाटीतील पहिला सामना पावसाने रद्द झाल्याने या सामन्यात विजय मिळवित नव्या वर्षाची आश्वासक सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज बनले आहेत.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलच्या साथीत डाव सुरू करताना गेल्या काही महिन्यांपासून संघातून दुखापतीने बाहेर असलेल्या धवनवर सरस कामगिरीचे दडपण राहणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडमधील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर पाठीच्या दुखापतीने संघाबाहेर असलेल्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे देखील लक्ष राहणार आहे.
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघातील स्थान पक्के करण्यासाठी धवनला या मालिकेत सरस कामगिरी करावीच लागणार आहे.
पहिला सामना पावसाने रद्द झाल्याने आता तीन सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत त्याला जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला दुखापतीने ग्रासले होते, मात्र त्यापूर्वीही त्याच्या धावा होत नव्हत्या. दुसरीकडे पाठदुखीतून सावरलेल्या बुमराहकडून कशी कामगिरी होते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संघटनेच्या हलगर्जीपणामुळे सामना रद्द
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. खेळपट्टी ओलसर असल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याचे आयोजन करताना आसाम क्रिकेट संघटनेकडून अत्यंत हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली याने स्पष्ट केले आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर स्टेडियममध्ये खेळपट्टी लवकर वाळावी यासाठी हेअर ड्रायर आणि चक्क इस्त्रीचा वापर करण्यात आल्याने जागतिक क्रिकेटसमोर संघटनेने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची खरोखर लाज काढली. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाकडे खेळपट्टी झाकण्यासाठी चांगली कव्हर्सदेखील नाहीत का, असा प्रश्न माजी कसोटीपटू आकाश चोप्राने विचारला.