आणखी तीन मंत्री मूळचे जिल्ह्यातील असल्याने समतोल विकासाची अपेक्षा
सातारा – राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात बाळासाहेब पाटील व शंभूराज देसाई यांनी सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वर्षा गायकवाड, एकनाथ शिंदे या मूळ सातारा जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा समावेश मंत्रिमंडळात झाला आहे. जिल्ह्याच्या राजकीय परंपरेत पाच मिंत्रपदांच्या निमित्ताने विकासाचा नवीन अध्याय सुरू झाला असून विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कॅबिनेट मंत्री म्हणून कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी शपथ घेतली असून त्यांना सहकार व पणन खाते मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार पाटील यांच्या पक्षनिष्ठेचा गौरव केल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. पाटणचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांना पर्यटन किंवा संसदीय कार्य खाते मिळण्याची शक्यता आहे. 2009 च्या पराभवानंतर देसाई यांनी 2014 व 2019 मधील निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येण्याची किमया साधली.
जिल्ह्यातून निवडू आलेल्या या दोन आमदारांखेरीज मूळ जिल्ह्यातील असणाऱ्याआणखी तिघांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. विस्तारामध्ये अजित पवार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांचे मूळ गाव नांदवळ आहे. त्याचबरोबर दरे बुद्रुक बामणोली येथील रहिवासी असलेले एकनाथ शिंदे यांनीही यापूर्वीच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांना नगर विकास खाते देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यातून पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येतात. मुंबई येथील धारावी मतदारसंघातून निवडून येणाऱ्या वर्षा गायकवाड मूळ सातारा तालुक्यातील कोंडवे गावच्या रहिवासी आहेत. त्यांना महिला व बालकल्याण खाते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्याचा वरचष्मा असल्याची चर्चा आहे. मात्र, याचा फायदा जिल्ह्याला किती होणार, हा प्रश्न विचारला जात आहे.
जिल्हयात धरणग्रस्तांचे रखडलेले प्रश्न, धरणे व कालव्यांची रखडलेली कामे, दुष्काळी भागासाठी असणाऱ्या पाणीयोजना, रखडलेले मेडिकल कॉलेज, सातारा शहराची हद्दवाढ, कास उंची मजबूतीकरण, खंबाटकीचा दुहेरी बोगदा, अन्यायकारक टोलवसुली, कारखान्यांकडून मिळणाऱ्या एफआरपीच्या दराबाबतचा असंतोष असे अनेक प्रश्न प्रलंबित असून या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक व्हावी, अशी जिल्हवासीयांची अपेक्षा आहे.
मकरंद पाटील यांना संधी मिळावी
वाई मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला आमदार मकरंद पाटील यांच्यामुळे एकहाती वर्चस्व मिळाले. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मतदारसंघाचे नेतृत्त्व करणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळात विस्तारात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मकरंद पाटील यांचे नाव वगळण्यात आल्याने सोमवारी समर्थक आक्रमक झाले. लोणंद नगरपंचायतीच्या काही नगरसेवकांनी थेट राजीनाम्याचा पवित्रा घेतला. मकरंद पाटील यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी संधी द्यावी, अशी पाटील समर्थकांची मागणी आहे.