संघटनेच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा समारोप
अभाविप प्रदेश संघटनमंत्री रायसिंह यांचे आवाहन
पुणे – राष्ट्रीय पुनर्निमाणाचे व्यापक काम सुरू असताना त्याम “अभाविप’च्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. देशात नागरिकत्व नोंदणी कायद्याला (सीएए) काही जण विरोध करत असले, तरी कार्यकर्त्यांनी हा कायदा समजावून सांगून त्याला समर्थन देणाऱ्यांची संख्या वाढवावी, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश संघटनमंत्री रायसिंह यांनी आज येथे केले.
कटारिया हायस्कुलच्या मैदनावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा समारोप सोमवारी झाला. त्यावेळी रायसिंग बोलत होते. देशाच्या विकासात चांगल्या कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्ता निर्माण करणे व त्याचा विकास करणे हे अभाविपचे वैशिष्ट आहे, असेही रायसिंग यांनी सांगितले.
समारोप सत्रापूर्वी सर परशुराम महाविद्यालय ते कटारिया हायस्कुल या दरम्यान शोभा यात्रा काढण्यात आली. त्यास अभिनेते प्रवीण तरडे यांनी झेंडा दाखवला. यामध्ये सुमारे दीड हजार विद्यार्थांचा सहभाग होता. यावेळी “भारत माता की जय, वंदे मातरम्’ यासह “सीएए’ समर्थनार्थ विद्यार्थांनी घोषणाबाजी केली.