पुणे : शासनाकडून 50 हजार रुपये कर्ज मिळवून देण्याच्या आणि साखळी पद्धतीने गुंतवणूकदारांची संख्या वाढवत नेल्यास त्यातून कमिशन, बक्षीस मिळवून देण्याच्या बहाण्याने तब्बल 153 जणांची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात एकाला विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी जामीन मंजुर केला आहे.
उद्धव विनायक क्षेत्रफळे (वय 34, रा. कात्रज, मूळ. धानोरी, ता. औसा, जि. लातुर) असे जामीन झालेल्याचे नाव आहे. त्याने ऍड. अभय सिरसट आणि ऍड. विजयसिंह निकम यांच्यामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. “राहत अभियान प्रा. लि.’ च्या कार्यालयात 21 नोव्हेंबर 2018 ते 15 मार्च 2019 या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, सात जणांवर गुन्हा दाखल आहे.
राहत अभियान कंपनीने सेमिनार घेऊन पाच ते पंधरा हजार रुपये गुंतवणूक केल्यास केंद्र सरकारकडून प्रत्येकी 50 हजार रुपये कर्ज, साखळी पद्धतीने गुंतवणूकदार वाढविल्यास काम कमिशन, घड्याळ, मोबाईल, लॅपटॉप, सोने, दुचाकी, कार, सदनिका बक्षीस देण्याचे अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे. क्षेत्रफळे शिक्षण घेत या कंपनीच्या कार्यालयात पार्ट टाईम काम करत होता. त्याचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग नाही, त्यामुळे जामीन देण्याची मागणी ऍड. शिरसट यांनी केली.