नागपूर: आज विधान परिषदेत मा. राज्यपाल यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर केलेल्या भाषणावर आ. हेमंत टकले यांनी सभागृहाला संबोधित केले. राज्याची राजभाषा ही मराठी असून शालेय अभ्यासक्रमात ती सक्तीची करण्याची लक्षवेधी सूचना काल केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मा. राज्यपाल यांनी मराठीत भाषण करण्याच्या भूमिकेचे स्वागत आणि अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील बदलत्या हवामानामुळे कृषी क्षेत्राचे फार नुकसान होत आहे. हाच मुद्दा राज्यपालांनी सभागृहाच्या निदर्शनास आणल्याचे हेमंत टकले यांनी सांगितले. शिवाय कृषी विषयक अनेक बाबींचा शासनाने विचार केला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तत्काळ निर्णय घेण्याची भूमिका या सरकारची आहे, असा राज्यपालांनी विश्वास दाखवल्याचे त्यांनी सांगितले.
आज राज्यात तरुण वर्गामध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. शिक्षण व रोजगारासाठी तरुण वर्ग शहराकडे स्थलांतरित होतोय. त्यामुळे वसतिगृह बांधण्याची सूचना तसेच आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा उल्लेख राज्यपालांनी आपल्या भाषणात केल्याचा अभिमान वाटतो, असे सांगत आ. हेमंत टकले यांनी ग्रामीण भागातील विकास कामांच्या परिस्थितीसंदर्भात देखील भाष्य केले. ते म्हणाले की, “ ग्रामीण भागात रस्त्याची स्थिती बिकट आहे. अपघाताचे प्रमाण वाढत आहे. यात सुधारणा करण्याची बाब राज्यपालांनी मांडली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना एक रुपया क्लिनिक अशी योजना सुरू करण्याची भूमिका देखील कौतुकास्पद असल्याचे राज्यपालानी सांगितले.
तसेच राज्यातील गडकिल्ल्यांचे संरक्षण करण्यात यावे. स्थानिक तरुणांना भौगोलिक पैलूंचे प्रशिक्षण दिल्याने युवकांना रोजगाराची संधी निर्माण करण्याची भूमिका राज्यपालांनी मांडली. मानव विकास निर्देशांक ही संकल्पना असून मानव विकासाचे मोजमाप करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. तू राज्यात राबवण्याचा उल्लेख राज्यपालांनी आपल्या भाषणात केला आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याची गरज असून सर्वांनी एकत्र येण्याचा सल्ला त्यांनी दिला. शिवाय शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा मुद्दा उपस्थित करत शिक्षणाचे खासगीकरण सुरु असल्याचे प्रामुख्याने सांगितले. सोबतच राज्यात संस्कृत विद्यापीठ होऊ शकते तर मग मराठी भाषेचे विद्यापीठ का होऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित करून हेमंत टकले यांनी मराठी भाषेचे विद्यापीठ लवकर स्थापन करण्याची विनंती सभागृहात केली.