नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉंग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा लवकरच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी विराजमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाच्या ‘भारत बचओ रॅली’त देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये याचीच चर्चा सुरु होती. रॅलीत लावण्यात आलेले कटआऊट्स, पोस्टर, बॅनर आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाही त्यांच्या अध्यक्षपद स्वीकारण्याकडे इशारा करत होते. इतकेच नव्हे तर वक्त्यांच्या सूचीतूनही त्यांच्या अध्यक्षपदाच्या शक्यतांना बळ मिळत होते.
रामलीला मैदानावर झालेल्या रॅलीत व्यासपीठावरुन खूप कमी लोकांनी भाषण केले. यामध्ये कॉंग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशिवाय ज्या नेत्यांच्या नावांचा समावेश होता, त्यात ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट आणि राजीव सातव यांचा प्रामुख्याने समावेश होता. हे सर्वजण राहुल यांच्या टीममधील नेते मानले जातात. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘माझे नेते राहुल गांधी’ अशी केली. रॅली बाहेरही राहुल यांना पुन्हा एकदा नेतृत्व सोपवण्याच्या मोहिमेने जोर पकडला आहे.
काही नेते आणि कार्यकर्त्यांनी ‘माय लीडर आरजी’ हॅशटॅगचा वापर व्टिरवर सुरु केला आहे. दिल्ली कॉंग्रेसच्या अधिकृत व्टिरवरही या हॅशटॅगला टॅग केले जात आहे. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने म्हटले की, आमच्या सर्वांची इच्छा आहे की राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व आपल्या हाती घ्यावे. पण, अंतिम निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. राहुल गांधीच सध्याच्या स्थितीत पक्षाचे नेतृत्व करु शकतात, असे कॉंग्रेसच्या अंतर्गत गोटातूनही बोलले जात आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सार्वजनिकरित्या राहुल गांधी यांनीच पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे, असे म्हटले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही बघेल यांचे समर्थन केले आहे.
कॉंग्रेसचे रणनीतीकारही मानतात की, अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी हेच पक्षाचा प्रमुख चेहरा आहेत. हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड येथे त्यांनी प्रचार केला आहे. सोनिया गांधी याही राहुल यांच्याकडे नेतृत्व सोपवू इच्छितात, असे पक्षातील काही नेते म्हणतात. राहुल गांधी यांनी अद्याप यावर कोणतेच मतप्रदर्शन केलेले नाही.