केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिले संकेत
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या मंजूरीनंतर सध्या देशात हिंसक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता या तयार करण्यात आलेल्या कायद्यात काही बदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याचे संकेत दिले आहेत. अमित शहा यांनी कॉंग्रेसवर नागरिकत्व (दुरुस्ती) अधिनियमाविरोधात हिंसा भडकवण्याचा आरोप केला. त्याचबरोबर ख्रिसमसनंतर या मुद्द्यावर विचार केला जाऊ शकतो, असे संकेतही त्यांनी आपल्या प्रचारसभेत दिले. दरम्यान, नागरिकत्व कायद्याविरोधात देशातील अनेक भागांमध्ये हिंसाचार उफाळला आहे. विशेषतः ईशान्येकडील राज्यात वातावरण तणावाचे आहे.
अमित शहांनी झारखंड निवडणुकीसाठी गिरिडोह, बाघमारा आणि देवघर येथील प्रचारसभेत ईशान्येकडील राज्यातील नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या अधिनयमामुळे त्यांची संस्कृती, भाषा, सामाजिक ओळख आणि राजकीय अधिकार प्रभावित होणार नसल्याचे ते म्हणाले.
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांबरोबर या मुद्द्यावर शुक्रवारी चर्चा करण्यात आली आहे. मेघालयमध्ये समस्या आहे. याबाबत कोणताच मुद्दा नाही हे मी त्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतरही त्यांनी मला कायद्यात काही बदल करण्यास सुचवले आहे. मी संगमा यांना ख्रिसमसनंतर माझ्याकडे येण्यास सांगितले आहे. आम्ही मेघालयसाठी रचनात्मक पद्धतीने मार्ग काढण्याचा विचार करत आहोत. कोणालाही घाबरण्याची गरज नाही.
राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले की, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष फक्त गोंधळ घालत आहेत. त्यांना भारताच्या इतिहासाची माहिती नाही आणि त्यांनी आपल्या डोळ्यांवर ‘इटलीचा चष्मा’ लावला आहे. आमच्या पक्षाचा युवा शाखेचा एक जिल्हाध्यक्षही झारखंडमध्ये मागील वर्षांत भाजपने कोणकोणती विकासकामे केली हे सांगू शकतो. राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसने वर्षांत आपल्या शासन काळात काय काम केले, असा सवाल त्यांनी केला.