यवत – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत (ता. दौंड) येथे इनोव्हा कार, टेम्पो, टॅंकर आणि क्रेटा कार या चार वाहनांमध्ये धडक बसून अपघात झाला या अपघातात दुदैवाने जीवितहानी टळली असून इनोव्हा कारमधील तीन जणांना मुका मार लागला आहे. मात्र या अपघातात चार वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला. शनिवारी सकाळी (सहजजूर, ता. दौंड) गावच्या हद्दीत अशाच प्रकारे पाच वाहनांमध्ये अपघात होऊन दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा चालक संतोष सुदाम चव्हाण (वय 30 वर्षे रा. प्लेजेंटपार्क, मिरारोड, जि. ठाणे) हे आपल्या ताब्यातील इनोव्हा कारमधून (एम एच 02 सीएच 3938) आई, वडील, वहिनी असे चौघे (भिगवण, ता. इंदापूर) येथे आपल्या आत्याच्या मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जात होते.
इनोव्हा कार यवत येथे आली असता चव्हाण यांनी आपली कार रस्त्याच्या डाव्या बाजूला घेऊन थांबवली. याच वेळी इनोव्हाच्या पाठीमागून टेंपो (एमएच 04 ईवाय 7002) हा वेगात येऊन त्याने वेग कमी केला. त्यावेळी टेम्पोच्या पाठीमागून येणारा टॅंकरने (एमएच 46 एआर 5888) पाठीमागून टेम्पोला जोराची धडक दिली.
टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोची इनोव्हा कारला ठोस बसली. टॅंकरच्या शेजारवरून जाणारी क्रेटा कारला (केए 36 पी 1739) टॅंकरची धडक बसली. मात्र या चार वाहनांच्या अपघातात जीवितहानी टळली असून इनोव्हा कारमधील तिघांना मुका मार लागला आहे. या अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो सोडून पळून गेला. इनोव्हा चालक संतोष चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून टेम्पो चालकाविरोधात यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तपास पोलीस हवालदार शशिकांत वाघ करीत आहेत.