भारताच्या दृष्टीने कुठल्याही देशामध्ये असलेले सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कलादान मल्टिमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टची ओळख आहे. भारत आणि म्यानमार यांना रस्तेमार्गाने जोडणाऱ्या या प्रकल्पाचा शेवटचा भाग सोडला तर बाकी सगळा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे. हा रस्ता आराकान आर्मी या बंडखोर गटांचे नियंत्रण असलेल्या भागातून जात असून अलीकडेच त्यांनी येथे काम करणाऱ्या भारतीयांवर हल्ला करून त्यांना पकडले होते. यामुळे या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
म्यानमारमधील सिट्टवे बंदरापासून ईशान्य भारतातील मिझोराम राज्यापर्यंत रस्ता बांधण्याचा भारताचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पाला कलादान मल्टिमोडल ट्रान्झिट प्रोजेक्ट (समुद्र-नदी-रस्ता मार्ग) म्हटले जाते. भारताच्या नकाशात पाहिल्यास ईशान्य भारताला समुद्रमार्गाने व्यापार करायचा असेल तर सर्वात जवळचे बंदर हे कोलकाता आहे. ते ईशान्य भारताच्या टोकाकडील मिझोराम, त्रिपुरापासून जवळपास 1880 किलोमीटर एवढे लांब आहे. मात्र जर आपण म्यानमारमधल्या सिट्टवे बंदरातून व्यापार केला तर ते अंतर 950 किलोमीटर इतकेच होत असून ते अत्यंत कमी अंतर होते. आर्थिकदृष्ट्या विचार केल्यास ईशान्य भारतातील राज्यांचा व्यापार वाढवण्यासाठी कलादान प्रोजेक्ट आपल्याला नक्कीच उपयोगी पडणार आहे. भारताच्या “ऍक्ट ईस्ट’ म्हणजे “पुर्वेकडील देशांकडे पाहा’ या धोरणांतर्गत हा रस्ता बांधण्याचे आपण ठरवले होते. परंतु यामध्ये काही अडथळे येत आहेत.
काही दिवसांपूर्वी या प्रकल्पावर काम करणाऱ्या पाच भारतीय नागरिकांना आराकान आर्मीने पकडले. हा म्यानमारमध्ये कार्यरत असणारा एक बंडखोर गट आहे. भारताने लगेचच या नागरिकांना सोडवण्याचा प्रयत्न केला आणि दोन दिवसांत त्यांना सोडलेही गेले. पण त्यापैकी एका नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. म्यानमारमध्ये भारतीयांवर झालेला हा दुसरा हल्ला होता. या आधीही अशाच हल्ल्यामध्ये भारतीयांचे नुकसान झाले होते. कलादान मल्टिमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या कामाला जानेवारी 2009 पासून सुरुवात झाली.
याआधी म्यानमारच्या राजधानीपासून पलेटावा इथे जाणाऱ्या बोटीवर सांगून हल्ला करण्यात आला होता. ही बोट भारतीय होती. कलादान प्रकल्प हा भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे. ह्या रस्त्यामध्ये समुद्राने कोलकात्याच्या हल्दिया बंदरापासून म्यानमारमधील सिटवे बंदरापर्यंत 579 किलोमीटर एवढे आहे. त्यानंतर सिटवेपासून पलेटवा या गावापर्यंत 158 किलोमीटरचा प्रवास हा कलादान नदीतून करावा लागतो. त्यानंतर पलेटवापासून झोरीनपुरीपर्यंतचा रस्ता 110 किलोमीटरचे अंतर हे रस्तेमार्गाने कापावे लागते. ह्याच रस्त्यावर आराकान सैन्याने हल्ला करून आपले काम थांबवण्याचा प्रयत्न केला होता.
झोरामपुरी हे मिझोराममधील एक गाव आहे. जिथे हा रस्ता भारतात प्रवेश करू शकतो. तिथून 100 किलोमिटर अंतरानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग 54 ला जोडला जाईल.
सिटवे बंदर पुर्णपणे तयार आहे. पलेटवा येथिल कलादान नदीवरील बंदरसुद्धा तयार आहे. मात्र पलेटवापासून झोरीनपुरीपर्यंतचा रस्त्याला आराकान आर्मीच्या हिंसाचारामुळे आणखी उशीर होऊ शकतो. सध्या भारतातून ईशान्य भारताकडून जाणारा रस्ता हा चिकन्स नेक म्हणजे सिलिगुडी कोरिडॉरमधून जातो. या मार्गाला पर्याय म्हणून म्यानमार आणि बांगलादेशामधून आपण नवीन रस्ते बांधण्याचा प्रयत्न करत आहोत.
आराकान आर्मीला काय पाहिजे?
यानिमित्ताने आराकान आर्मीचे उद्दिष्ट काय, त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. म्यानमारमध्ये अनेक बंडखोर गट काही ना काही कारणांमुळे म्यानमार सरकारविरोधात किंवा म्यानमार लष्कराविरोधात लढाया किंवा दहशतवादी कारवाया करत असतात. आराकान आर्मीला म्यानमारमधील राखीन प्रांताला स्वतंत्र करायचे आहे आणि त्याकरता तिथे खंडणी राज्य आणि हिंसाचार करत आहे. आराकान आर्मीची संख्या ही 7 हजारांच्या आसपास असावी. भारतासाठी महत्त्वाचा असलेला रस्ता हा त्यांच्या भागातून जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या रस्त्याच्या संरक्षणासाठी म्यानमार लष्कराने आराकान आर्मीचे या रस्त्याच्या बाजूला असणारी 12 शिबिरे 2019 म्हणजेच याच वर्षी उद्ध्वस्त केली. तरीही या रस्त्यावरती अजूनही पुरेसे संरक्षण मिळालेले नाही.
आराकान आर्मीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की त्यांना भारतीयांच्या विरोधात किंवा भारतीय लष्कराविरोधात कोणतीही कारवाई करायची नव्हती. त्यांनी पकडलेल्या एका भारतीय व्यक्तीच्या मृत्युविषयीही दुःख व्यक्त केले आहे. म्हणजेच आराकान आर्मी असे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की जो रस्ता भारत बांधत आहेत तो थांबवण्याचा ते प्रयत्न करत नाही. पण त्यांना असा संशय आहे की म्यानमार लष्कर त्यांच्या भागात घुसवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अर्थात कलादान प्रकल्प तिथे असलेल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. हा रस्ता उत्तम गुणवत्तेचा झाला तर त्या रस्त्याचा वापर करून आराकान आर्मीच्या विरोधात कारवाई करू शकते अशी भीती त्यांना वाटते.
काय करावे?
या परिस्थितीत भारताला काय करता येईल? भारतीय लष्कर सध्या म्यानमारच्या सैन्याबरोबर बंडखोरांच्या विरोधात एकत्रित कारवाया करत आहे. त्यामुळेच ईशान्य भारतातील बंडखोरांचे म्यानमारमधील शिबिरे उद्ध्वस्त करण्यात भारताला यश मिळाले आहे. म्यानमार लष्कर अत्यंत उत्तम पद्धतीने सहकार्य देत आहे. अर्थात भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये कधीच प्रवेश केला नव्हता. मात्र म्यानमार आर्मीमध्ये बंडखोरांविरोधात कारवाई करण्याची पुरेशी क्षमता नाही. त्यामुळेच भारतीय लष्कराने आराकान आर्मीशी थेट बातचीत करावी का? पण हे नक्कीच चुकीचे होईल.
कारण आराकान आर्मीला म्यानमारपासून वेगळे व्हायचे आहे, त्यामुळे भारतीय लष्कर थेट त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही. येत्या काळात आराकान आर्मीला या रस्त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाहीच पण त्या भागातील प्रगती अधिक वेगाने होईल, हे समजावण्याचा प्रयत्न आपण जरूर करू शकतो. ईशान्य भारतातील राज्यांच्या प्रगतीसाठी ही गोष्ट पूरक असल्याने त्यांच्या प्रगतीला वेग येईल. रस्ते बांधल्यामुळे केवळ व्यापारच वाढेल असे नाही तर पर्यटन आणि इतर विकासकामे यांनासुद्धा वेग येऊ शकतो. म्हणून कलादान प्रकल्पाचे संरक्षण करून भारतीयांच्या हितसंबंधांना कोणताही धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणेही गरजेचे आहे.
दखल
ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)