मुंबईत मात्र स्वच्छ पाणी, 13 राज्यांच्या राजधानीत अस्वच्छ पाणी
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह 13 राज्यांच्या राजधानींमध्ये नळाला येणारे पाणी पिण्यायोग्य नाही, अशी माहिती केंद्रीय सार्वजनिक वितरण आणि अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. महानगरांमध्ये केवळ मुंबईला दिले जाणारे पिण्यायोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतून पिण्याच्या पाण्याचे 11 नमुने घेतले. ते सर्व पिण्यास अयोग्य निघाले. मात्र, मुंबईतील नळाचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे आढळले. चंदिगढ, थिरूवनंतपुरम, पाटना, भोपाळ, गुवाहाटी, गांधीनगर, लखनऊ, जम्मू, जयपूर, डेहराडून, चेन्नई आणि कोलकात्यातील नळाचे पाणी भारतीय निकष पूर्ण करत नाही, असे पासवान म्हणाले. नळातून शुध्द पाणी पुरवठा केला जावा, यासाठी आग्रही राहण्याबाबत राज्यसरकारना पत्र पाठवले आहे. त्यामुळे पाण्याद्वारे होणारे आजार रोखता येऊ शकतील, असे ते म्हणाले.
दिल्ली वगळता 20 राज्यातून पाण्याचे नमुने मागवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जल ही जीवन मोहिमेअंतर्गत ही तपासणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दिल्लीतील विविध भागातून नळाच्या पाण्याचे नमुने गोळा करून ते भारतीय मानकांची पुर्तता करतात की नाही याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर 20 राज्यांच्या राजधानीतून नमुने घेण्यात आले, असे ते म्हणाले.
युरोपीयन राष्ट्रांमध्ये नळाचे पाणी पिण्यायोग्य आहे अथवा नाही याचा स्पष्ट उल्लेख करावा लागतो. यतशी सक्ती भारतात नाही. देशाच्या राजधानीतील सर्व म्हणजे 11ही नमुने पिण्यास अयोग्य ठरले. तर आर्थिक राजधानी मुंबईतील सर्व म्हणजे दहाही नमुने पिण्यायोग्य असल्याचे निघाले, असे त्यांनी स्पष्ट केले. या पुढील टप्प्यात इशान्येकडील राज्ये आणि स्मार्टसिटीसाठी निवडलेली शहरे यांचा समावेश करण्यात येणार आहे.