मुंबई: महाराष्ट्रात सध्या राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असून अद्याप तरी कुठला पक्ष सरकार स्थापन करण्याची समर्थता दाखवत नसल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे आहे. त्यासंदर्भात राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे अहवाल देखील पाठवला होता. परंतु आम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण का दिलं गेलं नाही? असा सवाल काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही सत्ता स्थापन करु शकू किंवा करु शकणार नाही काहीही असलं तरीही आम्हाला संधी का दिली जात नाही? त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पक्षपातीपणा करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. तसेच राज्यपाल हे भाजपाच्या हातातले बाहुले आहेत का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान तसंच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही राज्यपालांवर अशाच प्रकारचा आरोप केला आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की शिवसेना सत्ता स्थापनेसाठी मुदत वाढ मागत असताना देखील राष्ट्रपती राजवटीची एवढी घाई का केली जाते ते राज्यपालांनाच माहित. आणि राज्यातील परिस्थितीला भाजपचं जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
President’s Rule imposed in the state of #Maharashtra, after the approval of President Ram Nath Kovind. pic.twitter.com/tR3qW4xYbR
— ANI (@ANI) November 12, 2019
गेल्या दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सत्तास्थापनेचा घोळ सुरु आहे या घोळातून कोणताही पर्याय समोर येताना दिसत नाहीये. सुरुवातीला भाजपाला सत्तास्थापनेसाठी बोलवण्यात आलं. मात्र पुरेसं संख्याबळ नसल्याने आणि शिवसेना सोबत येऊ इच्छित नसल्याने आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही असं भाजपाने म्हटलं. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिलं आणि दावा सिद्ध करण्यासाठी त्यांना २४ तासांची मुदत दिली. मात्र शिवसेनेलाही दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला बोलवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसलाही आज रात्री ८.३० पर्यंत मुदत देण्यात आली आहे.