मंचर – थोरांदळे (त. आंबेगाव) येथे तुळशी विवाह थाटामाटात पार पडला. गणपती, हनुमान, श्रीकृष्ण, नारदमुनी, विठ्ठल-रुक्मिणी, श्रीराम, सीता, खंडोबा, शंकर महादेव अशा देव-देवतांच्या साक्षीने व हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत तुळशी विवाह पार पडला. थोरांदळे येथे दरवर्षी काकडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सवाची सांगता तुळशी विवाहाच्या कार्यक्रमाने होते. जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. सकाळी
काकडा महापूजा झाली. त्यानंतर दुपारी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचे घोड्यावर बसलेले खंडोबा देव विशेष आकर्षण होते. तर इतर देव-देवतांची रंगवलेली पात्रे मिरवणुकीत सहभागी झाली होती. पारंपरिक वाजंत्री मंडळींनी मिरवणुकीत शोभा आणली. ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर सायंकाळी मुहूर्तावर तुळशी विवाह पार पडला.
यावेळी माजी सरपंच सीताराम गुंड, सरपंच पुष्पा टेमगिरे, उपसरपंच दिनेश मिंडे, मंगेश टेमगिरे, बाळासाहेब टेमगिरे, सुरेश टेमगिरे, कपील विश्वासराव, मनोहर फुटाणे, राजेंद्र घायतडके, ज्ञानेश्वर टेमगिरे, मंगेश फुटाणे, श्रीराम टेमगिरे, दीपक टेमगिरे, सुरेश विश्वासराव आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत हभप विलास महाराज मिंडे यांनी तर सूत्रसंचालन बाळासाहेब टेमगिरे यांनी केले.