दोन दिवसांपासून मिरजगाव येथे नागरिकांना होतोय मनस्ताप; प्रशासनाकडून कार्यवाही नाही
कर्जत (प्रतिनिधी) – बुधवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी पावसाने कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नगर- सोलापूर महामार्गावरील पाणी अभिनव वसाहतीत शिरल्याने गेली दोन दिवसांपासून याठिकाणी नागरिक अडकले आहेत. प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल न घेता पाणी कमी होण्याची वाट पहात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
या पावसाने नगर – सोलापूर मार्ग छत्रपती चौक ते उकरीनदीपर्यत वाहून गेला असून गुडघ्या एवढे खड्डे पडले आहे तर बुधवारी झालेल्या धुवांधार पावसाने मार्गावरील गटारी अतिक्रमण धारकांनी मुरूम टाकल्याने पाणी जाण्यास मार्ग नसल्याने मोठ्या प्रमाणात हे पाणी महामार्गालगत असणाऱ्या अभिनव वसाहतीत घुसल्याने गेली. दोन दिवसापासून याठिकाणीचे नागरीक तसेच याठिकाणी दोन दवाखाने असल्याने याठिकाणीही काही रूग्ण अडकून पडले आहेत. याठिकाणी सांडपाण्याच्या गटारी असून रस्तावरील अतिरिक्त पाणी आल्याने गटारी बंद होऊन मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेने या भागातील नागरिकांचा संपर्क तुटला. या ठिकाणचे पाणी कमी झाल्याशिवाय कोणतीच उपाययोजना करता येणार नसल्याने प्रशासनही हातावर हात धरून बसले आहे.
पावसाळ्यापूर्वी महामार्गावरील या गटारी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोकळ्या केल्या असत्या तर हा प्रसंग उध्दभवला नसता या गलथान कारभाराबदल नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे ठोस उपाययोजना करण्यात यावी, महामार्गावरील पाणी आल्याने सातत्याने याठिकाणी पाणी साचत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या वसाहतीतील नागरिकांची आहे.
महामार्गावरील अतिक्रमण व गटारी मोकळ्या करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने देऊन, हे अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल.
सी. एम. वाघ ,तहसीलदार, कर्जत
या मार्गावरील गटारी शनिवारीपासून मोकळ्या करण्याचे काम सुरू करण्यात येऊन वसाहती अडकलेल्या नागरिकांना मुरूम टाकून रस्ता करून दिला जाईल व या मार्गावरील अतिक्रमणाबाबत लवकरच मोहीम हाती घेतली जाईल.
रामराम वाघ ,शाखा अभियंता, जागतिक बॅक प्रकल्प