लग्नसराईची धामधूम : वधू-वर पित्यांची मंगल कार्यालय बुकिंगसाठी धावाधाव
आळंदी – दीपावली संपल्यानंतर तुळशी विवाहाची लगबग सुरू होते. तुळशी विवाहानंतर लग्नाचा धुमधडाका सुरू होत असतो. यावर्षी शनिवारीपासून मंगळवारपर्यंत तुळशी विवाहाचा मुहूर्त आहे. तुळशी विवाह संपल्यानंतर मात्र जिल्ह्यात सनई-चौघडे मोठ्या प्रमाणात वाजणार आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातच तब्बल 11 विवाह मुहूर्त असल्याने सध्या अनेक ठिकाणी लगीन घाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीनंतर यंदा कर्तव्य आहे, असे म्हणणाऱ्यांना तुळशी विवाहानंतर अवघ्या सात दिवसानंतर लग्नाचे बाशिंग बांधता येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात 20 तारखेपासून विवाहाचे मुहूर्त आहेत. मागील वर्षी गुरू अस्तामुळे एक महिना उशीराने लग्नसराई सुरु झाली होती. मात्र, यावर्षी तसे काही नाही. यंदा झालेला दमदार पाऊस लग्न सोहळ्याच्या आनंदात टाकणारा घालणारा आहे. नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे चार मुहूर्त असून, शहरातील अनेक मंगल कार्यालयाची बुकिंग आधीच करण्यात आली आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमधील सर्व 11 मुहुर्ताचे बुकिंग आधीच करण्यात आले असल्याने दोन्ही महिन्यातील मिळून 11 मुहूर्ताचे बुकिंग फुल्ल झाले आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये 11 मुहूर्त
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याबरोबरच मे महिन्यातही तब्बल 10 विवाह मुहुर्त आहेत. त्यामुळे, वधू-वर पित्यांना लगीनघाईसाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे. गेल्या वर्षी विवाहाचे 86 मुहूर्त होते. यावर्षी मात्र विवाह मुहूर्तामध्ये मोठी घट झाली असून, केवळ 46 मुहूर्तच असल्याने ग्रामीण भागात अनेकांना घरच्या अंगण परिसरातच मंडप टाकून विवाह सोहळा उरकावा लागणार असल्याचे दिसत आहे.
मे महिन्यातील बुकिंगसाठी आतापासूनच धावपळ
पुढील वर्षी मे महिन्यात सर्वाधिक 10 मुहूर्त आहेत. त्यामुळे वधू-वर पित्यांची लग्नाच्या बुकिंगसाठी आतापासूनच धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये व लॉन असतानाही यावर्षी विवाह मुहूर्त कमी असल्याने ही संख्या अपुरी पडणारी आहे. त्यामुळे वधू-वर पित्यांची मंगल कार्यालये बुकिंगसाठी यंदा तारांबळ होण्याची शक्यता आहे.