आगामी काळात पुरवठा आणखी सुरळीत होणार ः केंद्रीय अधिकारी
पुणे – तीन महिन्यांपूर्वी काश्मीरसंबंधातील विशेष दर्जा रद्द झाल्यानंतरही महाराष्ट्रासह इतर राज्यांत होणाऱ्या मालाच्या वाहतुकीवर कसलाही परिणाम झालेला नाही. त्यामुळेच पुण्यासह विविध शहरांत येणाऱ्या सफरचंदाच्या भावावरही फारसा परिणाम झालेला नसल्याचे चित्र आहे. केवळ सफरचंदाचा वाहतुकीवर नाही, तर काश्मीरमधून वाहतूक होणाऱ्या केशर आणि इतर सुका मेव्याच्या वाहतुकीवरही परिणाम झालेला नाही. त्यामुळे काश्मीरमधील अर्थकारणावर परिणाम झाला नसल्याचे फलोत्पादन सचिव मंझुर लेन यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार चालू हंगामात आतापर्यंत काश्मीरमधून 10.78 लाख टन सफरदांची वाहतूक झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत 11.74 लाख सफरचंदांची वाहतूक झाली होती. आगामी काळात या वाहतुकीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण काश्मीर आणि जम्मूमधील वाहतुकीमधील सर्व अडथळे आता समाप्त झाले असून तेथील जनजीवन वेगाने पूर्वपदावर येत आहे. मात्र नेैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास मर्यादीत काळासाठी वाहतूकीवर परिणाम होऊ शकतो.
77 हजार ट्रकच्या माध्यमातून ही वाहतूक झाली आहे. श्रीनगर आणि जम्मूदरम्यानची वाहतूक पूर्ववत झाली असून फळांच्या वाहतुकीत अडथळे येऊ देऊ नयेत असे काश्मीर प्रशासनाने वाहतूक विभागाला सांगितले आहे. फळ नाशवंत असल्यामुळे त्यांची वाहतूक वेगात करावी असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार काश्मीरमधून सफरचंदासह इतर फळे भारताच्या विविध राज्यात पाठविण्यात येत आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.