पुणे – राज्यातील विविध साखर कारखान्यांना यंदाचा गळीत हंगाम फारसा सोपा नाही. प्रलंबित एफआरपी, सरकारी देणी देण्यास विलंब या कारणांसह साखर आयुक्त कार्यालयाने कोल्हापूर विभागातील 18 साखर कारखान्यांचे गाळप परवाने “होल्ड’वर ठेवले आहेत. ऐन साखर हंगामाच्या तोंडावर परवाने “होल्ड’वर ठेवल्याने खळबळ उडाली आहे.
पेंडिंग ठेवलेल्या कारखान्यांना 13 नोव्हेंबरला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरवर्षी साधारणपणे दि.1 नोव्हेंबरला राज्यातील साखर हंगाम सुरू होतो; पण यंदा महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतात पाणी असल्याने हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तरीही साखर आयुक्त कार्यालयाने कारखान्यांना गाळप परवाना देण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे.
कोल्हापूर विभागात 37 साखर कारखाने असून, कोल्हापूर जिल्ह्यात 22, तर सांगली जिल्ह्यात 15 कारखाने आहेत. बहुतांश कारखान्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बॉयलर प्रदीपन केले आहे. हंगाम सुरू करण्यासाठी परवाने मागितले असून, त्याप्रमाणे माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 11, तर सांगली जिल्ह्यातील सात कारखाने अशा 12 कारखान्यांचे परवाने “होल्ड’वर ठेवण्यात आले आहेत. अनेक कारखान्यांनी ऊस उत्पादकांची एफआरपी दिली असली, तरी अनेक सरकारी देणी दिलेली नाहीत. त्यामुळे त्यांचे गाळप परवाने होल्डवर ठेवले आहेत.
येत्या पंधरा दिवसांत सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून, त्यांना गाळप परवाने मिळाल्याशिवाय हंगाम सुरू करता येणार नाही. कारखान्यांना म्हणणे मांडण्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी पुण्यातील साखर आयुक्तालयात वेळ दिली आहे. त्यावेळी कारखान्यांना थकीत एफआरपी, सरकारी देणी यांचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. या सर्व कारखान्यांची बाजू समजुन घेतल्यानंतर त्यावर साखर आयक्तांकडून निर्णय घेतला जाणार आहे.