निर्बंध हटवण्याची केली मागणी
कर्तारपूर -कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना काश्मीर मुद्दा आठवला. काश्मीर खोऱ्यातील सर्व निर्बंध भारताने हटवावेत, अशी अनावश्यक मागणी त्यांनी केली.
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचे धडक पाऊल भारताने उचलले. त्यानंतर तिथे कुठले अनुचित प्रकार घडू नयेत या उद्देशातून काही निर्बंध लागू करण्यात आले. काश्मीरवर वाकडी नजर ठेऊन असणारा पाकिस्तान भारताने उचललेल्या धडक पाऊलामुळे अस्वस्थ आहे. त्यातून शक्य होईल तिथे पाकिस्तानकडून भारतविरोधी कांगावा केला जात आहे. त्याला कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाचा प्रसंगही अपवाद ठरला नाही. त्या सोहळ्यात बोलताना इम्रान यांनी रडगाणे गायले. काश्मीरमध्ये मानवतावादाचा पेच निर्माण झाला आहे.
काश्मिरी जनतेला जनावरांसारखी वागणूक दिली जात आहे. तब्बल 9 लाख जवानांच्या वेढ्यात ती जनता अडकून पडली आहे. काश्मिरी जनतेला मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे, असे आरोप त्यांनी केले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनीही इम्रान यांच्याप्रमाणेच गळा काढला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉरिडॉर खुला केल्याबद्दल इम्रान यांचे आभार मानले. आता काश्मीरमधील निर्बंध हटवून मोदीही इम्रान यांना आभार मानण्याची संधी देतील का, अशी विचारणा त्यांनी केली.