बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर हाराकिरी
नवी दिल्ली – कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमानंतरही भारतीय संघाला बांगलादेशकडून तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील विजयासह बांगलादेशने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
राजधानीत प्रदूषणाने कहर केला असून हा सामना होणार का नाही असा संभ्रम निर्माण झाला होता, मात्र सामन्याला सुरुवात झाली आणि या शंका दूर होत जवळपास 25 हजार क्रिकेट चाहत्यांनी अरुण जेटली मैदान भरुन गेले.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली. रोहितने दोन चौकार फटकावत विराट कोहलीच्या कामगिरीला मागे टाकत टी-20 क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून सर्वाधीक धावा करणारा फलंदाज बनण्याचा विक्रम साकार केला. रोहितला कोहलीची कामगिरी मागे टाकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता होती, त्याने 9 धावा करत कोहलीला मागे टाकले, मात्र त्यानंतर लगेचच तो पायचीत होऊन तंबूत परतला.
रोहितच्या बाद होण्यानंतर ठरावीक अंतराने भारताचे फलंदाज बाद होत गेले. जो संघ बलाढ्य फलंदाजीसाठी ओळखला जातो, त्याच फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. अत्यंत बेजबाबदार पद्धतीने एकेक फलंदाज बाद झाले. अर्थात बांगलादेशच्या गोलंदाजांनी देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतावर दडपण राखले. रोहितसह लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, पदार्पण करणारा शिवम दुबे यांनी घोर निराशा केली. शिखर धवन, ऋषभ पंत, कृणाल पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी थोडीफार आक्रमक फलंदाजी करत संघाच्या 148 धावा फलकावर लावल्या, मात्र त्यासाठी 6 फलंदाजांचे मोल द्यावे लागले. बांगलादेशकडून शफिकुल इस्लाम आणि अमिनुल इस्लाम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करत भारताला दीडशतकी मजल देखील मारुन दिली नाही.
विजयासाठी 149 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी सावध सुरवात केली. संघाच्या 8 धावा फलकावर असताना लिंटन दास बाद झाला. त्यावेळी त्यांच्याही फलंदाजांना अपयश येईल अशी शक्यता निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला. महंमद नईम व सौम्य सरकार यांनी संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
नईम बाद झाल्यानंतर मशफिकुर रहिमने सरकारच्या साथीत संघाचा डाव सावरला. नईम आणि सरकार बाद झाल्यानंतर मुशफिकुर रहिमने तडाखेबंद 60 धावांची खेळी करताना महंमदुल्लाच्या साथिने संघाचा विजय साकार केला. या दोन संघात या सामन्यापूर्वी झालेल्या 8 सामन्यांत भारतीय संघानेच विजय मिळविले होते, मात्र आजच्या सामन्यातील विजयाने बांगलादेशने हा इतिहास पुसून काढला.
धोनीला मागे टाकले – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व रोहितने 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते, रविवारच्या सामन्यात नाणेफेकीसाठी रोहित मैदानात आल्यावर लगेचच देशाकडून सर्वाधीक सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याचबरेबर हा सामना जागतिक टी-20 क्रिकेटमधील 1 हजारावा सामना ठरला.
संक्षिप्त धावफलक –
भारत : 20 षटकांत 6 बाद 148. (शिखर धवन 41, ऋषभ पंत 27, श्रेयस अय्यर 22, लोकेश राहुल 15, कृणाल पंड्या नाबाद 15, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 14, अमिनुल इस्लाम 2/22 शफिकुल इस्लाम 2/27, आफिफ होसेन 1/11.
बांगलादेश : 19.3 षटकांत 3 बाद 154.(मुशफिकुर रहिम नाबाद 60, सौम्य सरकार 39, महंमद नईम 26, महंमदुल्ला नाबाद 15, यजुर्वेंद्र चहल 1/24, दीपक 1/24).