चाकरमानी, प्रवाशांचे हाल : पोलिसांच्या मदतीमुळे चौक कोंडीमुक्त
उरुळी कांचन – उरुळी कांचन ते सोरतापवाडी ते पेठ फाट्यापर्यंत तीन ते चार किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दिवाळीत सुट्टीला जाणाऱ्या चाकरमानी आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
शनिवारी (दि.26) सकाळी उरुळी कांचन येथील तळवाडी चौक तसेच एलाईट चौक ते सोरतापवाडी व पेठ फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये उरुळी कांचनमधील तळवाडी चौकात एसटी, बसेस थांबल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांना मिळाल्यावर यांनी सहायक पोलीस निरीक्षक पवण चौधरी यांच्यासह सहायक पोलीस संदीप कांबळे, पोलीस सचिन पवार, सोमनाथ चित्तारे, पोलीस मित्र संघटनेचे सचिव अर्चना सरोदे, सारिका शेंडगे, सीमा पाटील, महादेव दुरगुळे, होमर्गाड यांना घेऊन वाहतूक कोंडी सुरळीत केली.
सोरतापवाडी, कोरेगाव मूळ फाटा, चौधरीवस्ती, इनामदार वस्ती आदी भागात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी पोलीस होमर्गाडसह उभे केल्यावर वाहतूक कोंडी सुरळीत झाली. भाऊसाहेब म्हस्के, अनिल कदम, बाळासाहेब गाडगे यांनी सहकार्य केले.