बाजारपेठेत लक्ष्मीपूजन साहित्य खरेदीसाठी गर्दी
पावसाच्या उघडीपीने उत्साह ओसंडला
सातारा (प्रतिनिधी) – “चला दीप उजळू नवे स्नेहाचे, मनोमनी, राहो नाते हे मांगल्याचे’ अशा मंगलदायक वातावरणात दीपावलीचे स्वागत करण्यासाठी अवघे सातारकर सज्ज झाले आहेत. दिवाळीची धामधूम शिगेला पोहोचली आहे. घरोघरी लक्ष्मीच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे अवघे जनजीवन दीपोत्सवाच्या वातावरणाने आत्तापासूनच भारावून गेले आहे. सगळीकडे या सणाचा माहोल तयार झाला असून साताऱ्याची बाजारपेठ अक्षरश: नटली आहे.
दिवाळी, धनत्रयोदशी, झाल्यानंतर रविवारी नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन, हे दोन्ही मुहूर्त एकाच दिवशी येत आहे. सोमवारी 27 रोजी बलिप्रतिपदा आणि मंगळवारी 28 रोजी भाऊबीज अशी तीनच दिवस दिवाळी आहे. प्रकाश आणि मांगल्य विचारधारा असलेला असा हा सणांचा उत्सव आहे. दिवाळी या एकाच शब्दात जीवनाचं सार, मांगल्य सामावलं आहे. पणत्यांचं तेज, कंदिलाची शोभा, रांगोळ्याचं सौंदर्य, आकाशातली रोषणाई अशा मनमोहक वातावरणाने आसमंत उत्साहाने भरून जाणार आहे. हा वर्षातील सर्वात मोठा व आनंदाचा सण आहे. म्हणूनच “दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं बोललं जातं.
अबालवृध्द हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. यंदाही तेच तेज घेवून दीपावली येणार आहे. बाजारामध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीबरोबरच कपडे व दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी धांदल उडाली आहे. शनिवारी साताऱ्यात पावसाने दुपारनंतर उघडीप दिली. त्यामुळे राजवाडा, मोती चौक, खण आळी परिसर गर्दीने गजबजले. साताऱ्यात सायंकाळी सातच्या नंतर राजपथावर वाहनांची आणि खरेदीदारांच्या प्रचंड गर्दीमुळे पाय ठेवायला जागा नव्हती. गोलबागेला पणत्या, आकाश कंदिल तसेच किल्ले शिवराय आणि मावळ्यांच्या प्रतिमा विकणाऱ्या विक्रेत्यांनी वेढा दिला होता. लक्ष्मीच्या खरेदीची लगबग तसेच बोळकी लाह्या बत्तासे यांना मागणी होती.
90 ते 120 रुपये किलो दरांनी झेंडूची फुले विकली जात होती. नैवेद्यासाठी बेसनलाडू चारशे रूपये किलो भावाने विकले जात होते. सराफ बाजारातही ट्रेंडी दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी दिसली. अनेकांनी बाजार व बजेटचा अंदाज घेवून खरेदी सुरू केली आहे. दिवाळीचे जय्यत स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. मोबाईल, सोशल नेटवर्कींगच्या जमान्यातही दिवाळीचा शुभसंदेश पोहोचविण्यासाठी नागरिकांकडून ग्रिटींग्ज कार्डस्ना पसंती दिली जात आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा देणारी विविध ग्रिटींग्ज तरूणाईला भुरळ पाडत आहेत. ज्ञानदेवाच्या अभंगापासून आधुनिक कवितेपर्यंत नेमक्या शब्दांत शुभेच्छा व्यक्त करणारी ग्रिटींग्ज लक्ष वेधून घेत आहेत.