मुंबई : भाजप सरकारमुळे महाराष्ट्र डबघाईला आला. त्यामुळे भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठीच जनतेने कौल दिला आहे. आमची भूमिका विरोधी पक्षाची असली तरी भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. त्यासाठी सत्तेचे समीकरण बनविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यायला हवा. शिवसेनेसोबत कुठलीही चर्चा झाली नसली तरी शिवसेनेने आता भूमिका घ्यायला हवी, असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडले.
मुंबईत आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. राज्यातील जनतेची कॉंग्रेस आघाडीला सत्तेत बसविण्याची इच्छा होती. मात्र जनतेचा कौल समजण्यात आम्ही कमी पडल्याची कबुली देताना वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी, कामगार, बेरोजगार युवक या सर्वांचाच रोष या सरकारवर होता. राज्याला खड्डयात टाकण्याचे काम भाजपने केले आहे. राज्य यांच्या नेतृत्वात प्रगती करणार नाही असे जनतेला वाटते.
आमच्याकडे पुरेशी साधनसामुग्री नव्हती. त्याचवेळी भाजप प्रत्येक मतदारसंघात 10 कोटी वाटत होता. आमच्यातीलच काही लोक सत्तेच्या हावरटपणापायी भाजपासोबत गेले. पण आम्ही अधिक मेहनत घेतली असती तर आज राज्यात कॉंग्रेस आघाडीची सत्ता आली असती, असेही ते म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी जर कॉंग्रेससोबत आली असती तर राज्यात चित्र वेगळे दिसले असते. आज राज्यात आघाडी सरकार सहज आले असते, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.