मुंबई : शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यातील सत्तासमीकरणांच्या जुळवाजुळवीचा प्रश्न अधिक किचकट बनला आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी आम्ही विरोधातच बसणार असून जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शिवसेनेने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या वाटपाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे भाजप-शिवसेनेत पेच निर्माण होणार आहे. कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेने या विषयावर भूमिका घ्यावी, असे आवाहन केले आहे.
मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी सरकार स्थापना हा भाजप-शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. त्यात आम्ही कोणताही हस्तक्षेप करणार नाही. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण आम्ही विरोधी बाकावरच बसणार असून जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.