एक डाव आणि 202 धावांनी विजय ः रोहित सामन्याचा व मालिकेचा मानकरी
रांची: भारताने दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी दणदणीत पराभव करत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकत व्हाईट वॉश दिला. पहिल्या डावात 162 धावांमध्ये हाराकिरी पत्करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही 132 धावांवर संपला. या सामन्यात द्विशतकी खेळी करणारा रोहित शर्मा सामन्याचा व मालिकेचा मानकरी ठरला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा भारताचा सलग तिसरा कसोटी विजय असून या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकली. चौथ्या दिवशी 8 बाद 132 धावांवरून पुढे फलंदाजी सुरू केल्यानंतर पाहुण्यांना केवळ एकाच धावेची भर घालता आली. भारताने आज विजयाची औपचारिकता केवळ नऊ मिनिटांत पूर्ण केली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेला हा आजवरचा सर्वात मोठा मालिका विजय आहे.
कोहलीच्या संघाने विशाखापट्टणम येथील पहिल्या कसोटी सामन्यापासून फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही बाबतीत पाहुण्यांवर जबरदस्त वर्चस्व गाजविले. आज तिसरा सामना जिंकून भारताने दक्षिण आफ्रिकेला “व्हाईट वॉश’ दिला. पहिल्या डावात रोहित शर्माच्या द्विशतकाच्या जोरावर 497 धावांचा डोंगर उभारणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात अवघ्या 162 धावांवरच रोखले आणि फॉलोऑन दिला.
संधीच्या शोधात होतो – रोहित
या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील पहिले द्विशतक फटकावणारा रोहित शर्मा या सामन्यासह मालिकेचाही मानकरी ठरला. भारतीय संघाची निवड समिती, व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी मला कसोटीत सलामीवीराची भूमिका निभावण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मलादेखील अशीच एक संधी हवी होती, मला स्वतःला सिद्ध करायचे होते. माझ्या धावा झाल्या, या प्रकारच्या क्रिकेटमध्येही यशस्वी होण्यासाठी मी अत्यंत मेहनत घेत होतो, या मालिकेमुळे मला कसोटी फलंदाज अशी ओळखही मिळाली याचा जास्त आनंद होत आहे.
दुसऱ्या डावातही पाहुण्यांचे फलंदाज भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करू शकले नाहीत. ठरावीक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि अखेर दीडशतकी धावांच्या आतच त्यांचा डाव संपला. दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज 30 पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. सलामीवीर डीन एल्गार जायबंदी झाल्याने त्यांची फलंदाजी आणखीनच दुबळी झाली, त्यातच कर्णधार फाफ डुप्लेसी, क्वांटन डिकॉक यांनीही निराशा केल्याने त्यांना भारतासमोर साधे आव्हानही ऊभे करता आले नाही.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर त्यांच्या 8 बाद 132 धावा होत्या. भारताला निर्विवाद विजयासाठी केवळ दोन गडी बाद करायचे होते. भारतीय संघात पदार्पण करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने आजच्या चौथ्या दिवसातील दुसऱ्याच षटकात दक्षिण आफ्रिकेच्या थिओनिस ब्रुयॉन आणि लुंगी एन्जीडी यांना बाद करत नदिमने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. सोमवारी खेळ थांबला त्यावेळच्या धावसंख्येत केवळ धावेची भर पाहुण्यांना घालता आली. भारताकडून महंमद शमी याने तीन गडी बाद केले. उमेश यादव व शाहबाज नदीमने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक बळी घेतला.