उत्तरप्रदेश सरकारच्या निर्णयावर बीकेयु संतप्त
मुज्फरनगर: उत्तरप्रदेशातील सरकारने वीज बिल थकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी भारतीय किसान युनियने तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा शेतकऱ्यावरील अन्याय असून आम्ही असा अन्याय सहन करणार नाही असा इशारा या संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी दिला आहे. त्यांनी नमूद केले की उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची उसाची बिले अजून मिळालेली नाहीत. आणि ती मिळायच्या आधीच सरकारने वीज बिल भरले नाही म्हणून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
उत्तरप्रदेशातील हजारो शेतकऱ्यांच्या उस बिलाचे पैसे कारखान्यांकडे थकलेले आहेत. ते पैसे त्वरीत देण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने देऊनही ही बिले अजून अदा झालेली नसताना सरकारने शेतकऱ्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे हा अघोरी अन्याय आहे असेहीं टिकैत यांनी म्हटले आहे.