संरक्षण कठडे नाही, उंची कमी, ठिकठिकाणी पडले खड्डे
चिंबळी- तीर्थक्षेत्र आळंदीकडे जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरूनच जवळचा मार्ग म्हणून चिंबळीफाटा येथून जाणारा केळगाव रस्ताचा वापर वाहनचालकांकडून केला जातो त्यामुळे मार्गावर कायमच वाहनांची वर्दळ असते. मात्र, येथील साकव पुलाची कमी असलेली उंची, नुकताच झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे पुलावरील संरक्षण कठडे वाहून गेले तर पुलावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे हा पूल धोकादायक झाला असून एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वी नजीकच्या गावांना जोडणारा रस्ता म्हणून या रस्त्याची ओळख होती. आता महामार्गाला जोडणारा रस्ता म्हणून केळगाव रस्त्याची ओळख झाली आहे. या साकव पुलाची उंची कमी आहे. यामुळे ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास पाणी थेट पुलावरून वाहते या पाण्याला पुराचे स्वरूप प्राप्त होत असल्याने यातून वाहने घेऊन धोक्याचे ठरते. पुलाला कठडे नसल्याने पायी चालणारे पुलावरून जाण्यास तयार नाहेअ. यामुळेच केळगाव येथील ओढ्याच्या साकव पुलाची दुरूस्ती करून उंची वाढवावी, अशी मागणी येथील ग्रामस्तांनी केली आहे.
आंळदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केळगाव येथे ओढ्यावर गेल्या 15 वर्षांपूर्वी हा साकव पूल बांधण्यात आला आहे; परंतु आळंदीकडे जाणाऱ्या मालवाहू गाड्यांची व दुचाकी वाहनांची सतत वर्दळ वाढली असल्याने यापुलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पावसाचे पाणी त्या खड्ड्यात साचत आहे. वाहन चालविताना अंदाज येत नसल्याने त्या ठिकाणी वाहने बंद पडतात; त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होते आहे, तर दरवर्षी पावसाळ्यात या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते, त्यामुळे आळंदीकडे जाणारी वाहने या ठिकाणी थांबवली जातात त्यामुळे वाहनांची रांग लागली जाते त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीकडे जाणाऱ्या भाविकांसह स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने या साकवपुलाची दुरूस्ती करून उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी जोर धरीत आहे.