गेल्या 48 तसांपासून बरतोय : घर व दुकानांमध्ये शिरले पाणी
आळंदी- गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या सततच्या परतीच्या पावसाने आळंदीकरांची दैना केली आहे. आळंदी-मरकळ या नऊ किमी अंतरावर असणाऱ्या रस्त्याची या पावसामुळे पूर्णत: “वाट’ लागली असून, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्ड म्हणण्याची वेळ आली. तर वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत, तर पादचाऱ्यांची कुंचबणा होत आहे.
आळंदी शहरासह परिसरात गेल्या 48 तासापासून सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरात शेतात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेला घास या पुरामुळे हिरावला गेला आहे. तर रस्त्यावर व बिल्डर लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी नैसर्गिक ओढे-नाले बुजविल्याने पाण्याचे स्त्रोत ठिकठिकाणच्या रस्त्यावरून वाहू लागले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक या बिल्डरांच्या स्वार्थी वागणुकीवर कमालीची नाराजी व्यक्त करीत आहेत. संबंधित बिल्डरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आळंदी-मरकळ मार्ग रस्ता येत्या कार्तिकी वारीपूर्वी संबंधित खात्याच्या विभागाने दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत या जोरदार पावसामुळे काही ठिकाणी मंदिरात तर काहींच्या घरात पाणी शिरले होते. माऊली मंदिर परिसरात देखील पाणी शिरल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते आहे.