मुंबई : मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल, असा इशारा देत मेट्रोमुळे जागांचे भाव वाढतील त्यामुळे मराठी माणूस मुंबईतून बाहेर पडतील आणि परप्रांतीय येथे येतील, हातातील मुंबई सोडू नका, बुलेट ट्रेन मेट्रो हे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या राजकारणाचा भाग आहेत या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार त्यांनी केला.
प्रभादेवी येथील सभेत राज ठाकरे म्हणाले, हे सरकार तुमच्या इच्छा आकाक्षांवर वरवंटा फिरवत आहे. आरेचं जंगल एका रात्रीत नष्ट केलं. हा त्याचाच पुरावा आहे. मेट्रो आणली की जागांचे भाव वाढतील. या जागा मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर जातील. त्यातून तुम्ही मुंबईच्या बाहेर पडाल. कल्याण डोंबिवली करत आणखी आणखी पुढे जाणार, अरे बाबांनो असं करु नका नाहीतर सरकत सरकत उझबेकिस्तानला जाल.
सरकारच्या स्वार्थी कारभारापुढे तुम्ही गप्प बसणार. या सरकारचा कारभार नादान आहे. दादर, प्रभादेवी, परळ, लालबागमध्ये मराठी भाषा कमी होते आहे हिंदी भाषिक जास्त दिसत आहेत. शिवाजी पार्क मैदानाची भाषा बदलू लागली आहे संध्याकाळी गेल्यावर तुम्हाला कानावर कोणती भाषा येते ते ऐका. जे तुमच्या हक्काचं आहे तेही तुम्हाला टिकवता येत नाही असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
” मेट्रो मराठी माणसाचा घात करणार, मी हे वाक्य विरोधासाठी विरोध करायचा म्हणून उच्चारलेलं नाही. मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. मात्र ही मेट्रो मराठी माणसाचा घात करणार, अशा प्रकारचं दळणवळण वाढलं की जागांचे भाव आणखी वाढतात. शहरांमध्ये गर्दी होऊ नये गर्दी बाहेर जायला पाहिजे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ते कुठेही होताना दिसत नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मेट्रोसाठी तुम्हाला चिरडणार आणि आरेमधली झाडंही चिरडून टाकली असाही आरोप राज ठाकरेंनी केला.