नवी दिल्ली: बालवाडी शिक्षणात लेखी अथवा तोंडी परिक्षा घेण्यास एनसीईआरटीने मनाई केली आहे. ही अनावश्यक आणि घातक प्रथा आहे असे या संस्थेने म्हटले आहे.
एनसीईआरटी म्हणजेच नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ऍन्ड ट्रेनिंग ही संस्था केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी संस्था असून सरकारी शिक्षणाचा अभ्यासक्रम निश्चीत करण्याचे काम ही संस्था करते. त्यांनी म्हटले आहे की या मुलांची लेखी अथवा तोंडी परिक्षा घेऊन त्यांना पास किंवा नापास ठरवता येणार नाही.
काही ठिकाणी पालकांच्या आग्रहातूनच बालवाडीतील मुलांची परिक्षा घेऊन त्यांचे मुल्यमापन करण्याची प्रथा सुरू आहे. पण ती घातक आहे. अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे असे या संस्थेने म्हटले आहे. बालवाडीतील मुलांना खेळणे बागडणे हा त्यांचा अधिकार असला पाहिजे त्यांना परिक्षांच्या जंजाळात अडकवणे हे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.
बालवाडीतील मुलांसाठी काय योग्य काय योग्य या विषयी एनसीईआरटीने मार्गदर्शक तत्वे निश्चीत केली आहेत. त्यात लेखी अथवा तोंडी परिक्षांना पुर्ण मनाई करण्यात आली आहे. या मुलांची प्रगती त्यांच्या वर्तनातून आणि त्यांच्या जो कल आहे त्यातून अभ्यासली पाहिजे असेही यात सुचवण्यात आले आहे.