पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या 150 जयंती निमित्ताने नदी पुणे व पिंपरी-चिंचवड, नाशिक, अहमदनगर शहरात नदीकाठ स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. फीट इंडिया उपक्रम व प्लॅस्टिक निर्मूलनाचा निर्धारही करण्यात आला आहे.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एम. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. विलास उगले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अधिसभा सदस्य भागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.
शहरातील 150 महाविद्यालयांतील 7 हजार 200 विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. मुळा, मुठा, पवना नदीकाठावरील 22 पुलांवर व त्या जवळील भागात विद्यार्थी जमा झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नदी स्वच्छतेची शपथ घेतली.
नदीपात्रातील राडारोडा एकत्र जमा करण्यात करून तो महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला. पुरातून वाहून आलेला गाळ व राडारोडा एकत्र करण्याचे कामही स्वयंसेवकांनी केले आहे. नदीकाठावर वुई पुणेकर्स यांनी आयोजित केलेल्या नदी आरती कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी शनिवारवाड्याजवळ प्लॅस्टिक निर्मूलनाची शपथही विद्यार्थ्यांनी घेतली. महापालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमास भेट देऊन सहभाग नोंदविला
आहे.