अर्शद आ. शेख
श्रीगोंदा – विधानसभा निवडणुकीसाठी दादा, बाबा, अण्णा यांच्यासह असंख्य उमेदवारांची सध्या भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे. एकवेळ अशी होती की श्रीगोंद्यातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार मिळत नव्हता. यावर आज अनेकांचा सहज विश्वास बसणार नाही. मात्र हे सत्य आहे. सलग 15 वर्षे श्रीगोंद्याचे आमदारपद तालुक्याबाहेरील व्यक्तीकडे होते. स्वातंत्र्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनी 1978 ला तालुक्यातील पहिले भूमिपुत्र आमदार झाले ते दिवंगत शिवाजीराव नागवडे.
1962, 1967, 1972 च्या तीन विधानसभा निवडणुकात श्रीगोंद्यातील कोणाही नेत्याने आमदारकी लढविली नाही. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर श्रीगोंदा मतदारसंघाची पहिली निवडणूक 1962 ला झाली. पहिले आमदार होते बाबूराव महादेव भारस्कर. त्यांचे मूळ गाव शेवगाव. 1962 च्या निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघ अनु.जातीसाठी राखीव होता. तालुक्यात नेतृत्वाची वानवा नव्हती. अनेक पुढारी होते. परंतु अनुसूचित जातीपैकी एकही सक्षम नेता या तालुक्यात नव्हता. आता उमेदवारी कोणाला द्यायची ? कॉंग्रेस हा मुख्य पक्ष. त्याचा प्रभाव सर्वत्र होताच.
कॉंग्रेसने उमेदवारी दिली की विजय नक्की, हे समीकरण होते. पक्षाला विजयाची खात्री. मात्र सक्षम उमेदवार नाही. हा पेच वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आला. पुढे विधानसभेचे सभापती झालेले बाळासाहेब भारदे तेव्हा जिल्ह्यातील बडे नेते व प्रस्थ होते. बाबूराव भारस्कर त्यांचे कार्यकर्ते. त्यांनी भारस्कर यांना श्रीगोंद्यातून उमेदवारीची शिफारस पार्लमेंटरी बोर्डाकडे केली. भारदे यांच्या प्रभावाने त्यांना उमेदवारी मिळाली. अन् 12 हजार 961 मते मिळवून भारस्कर विजयी झाले. प्रभाकर रोहन (आरपीआय) यांना सहा हजार 429 मते मिळाली. 6532 मतांनी रोहन पडले. 1967 ला पुन्हा एकदा भारस्कर यांनी कॉंग्रेस उमेदवार म्हणून बाजी मारली. त्यांच्यासह विरोधी उमेदवारा पैकी कोणीही श्रीगोंद्यातील नव्हते.
भारस्कर यांनी आरपीआयचे ए. जी. शिंदे यांचा 7124 मतांनी पराभव केला. भारस्कर यांनी आमदारकीची हॅट्ट्रिक साधली. त्यांनी बंडखोरी केली व कॉंग्रेस उमेदवार प्रभाकर शिंदे (15992 मते) यांचा पराभव केला. भारस्कर यांना 19853 मते मिळाली. डब्ल्यू. डी. ओहळ (1814 मते) तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 1977 पर्यंतच्या राजकारणावर तालुक्या बाहेरील नेत्याकडे लोक प्रतिनिधींत्वाची सूत्रे होती.
श्रीगोंद्याच्या राजकारणावर आरपीआयचा प्रभाव
श्रीगोंदा मतदारसंघावर रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव होता. हे आज खरे वाटणार नाही. सलग तीन विधानसभा निवडणुकीत आरपीआय हा येथे प्रमुख विरोधी पक्ष होता. पहिल्या विधानसभा निवडणुकीत 1962 ला येथून विजयी होण्यासाठी आरपीआयचे उमेदवार प्रभाकर जनार्धन रोहन यांना फक्त 6532 मते कमी पडली. 1967 ला आरपीआयचे उमेदवार ए. जी. शिंदे यांना 7124 मते मिळाले. 1972 ला आरपीआयचे डब्ल्यू. डी. ओहळ तिसऱ्या क्रमांकावर राहिले.