चिंबळी – नाशिक-पुणे महामार्गावरील नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक, प्रवासी वैतागले आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अवस्था “रोजचं मढं त्याला कोण रडं’ अशी झाली आहे. जिथे केवळ 10 मिनिटांच अंतर आहे, तिथे पोहोचायला एक ते दीड तास लागत असल्याने प्रावसी या मार्गावरून प्रवास “नको रे बाबा’ म्हणू लागले आहेत.
मोशी, आळंदी फाटा, कुरुळी, चिंबळी फाटा, चाकण, राजगुरूनगर येथे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे. शासनदरबारी गेल्या कित्येक दिवसांपासून महामार्ग विस्तारीकरणाचे केवळ नियोजनच होत आहे. मात्र, महामार्गावरील नित्याच्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी व स्थानिक कंटाळले आहेत. वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत, तर अनेक जण जखमी झालेत. तरी केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळत नाही. दरम्यान, या विरोधात नागरिकांनी अनेकवेळा प्रचंड रोष व्यक्त केला; मात्र उपयोग झालेला नाही. वेळेवर आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करणारे वाहनचालक अनेकदा तीन-चार तास या वाहतूककोंडीत अडकून पडतात.
वाहतूक कोंडीची सर्वांत मोठी समस्या चाकण तळेगाव चौकात भेडसावते. तळेगाव-न्हावरे व पुणे-नाशिक महामार्ग जोडणारा हा चौक असून सर्वाधिक जड वाहतूक या मार्गाने होते. हलकी आणि जड अशी दोन्ही वाहने या मार्गावरून जात असल्याने त्यामानाने छोटा चौक असलेल्या या मार्गावरील वाहने एकत्र आल्यावर लहान चौक, निमुळता रस्ता आणि खड्डे त्यातच रस्त्यालगत उभी असलेली अनधिकृत वाहतुकीची वाहने यामुळे या दोन्ही मार्गावर वाहतूक नियंत्रण दिव्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. बऱ्याचदा सिग्नलही बंद असतो, पुढे जाण्याच्या नादात अनेक वाहने मार्ग सोडून सेवा रस्त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे वाहतूककोंडी ही नित्याची झाली आहे. या सर्व गदारोळात वाहतूक नियंत्रक पोलीस आपली भूमिका पार पाडत असताना शक्य तितका प्रयत्न करून वाहने पुढे काढत महामार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, पोलिसांची संख्या कमी व वाहनांची संख्या जास्त त्यामुळे पोलिसांचे प्रयत्न असफल ठरतात.
प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करणे गरजेचे
एकंदरीत महामार्गाची अवस्था पाहता विद्यार्थी, कामावर जाणारे चाकरमानी, रुग्णवाहिका कोणीही वेळेवर पोहोचू शकत नाहीत. प्रथमोपचार म्हणून प्रशासनाने पहिले खड्डे बुजविले पाहिजे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे असून प्रलंबित महामार्गाचे तसेच बाह्यवळण मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील नित्याच्या वाहतूककोंडीने प्रवासी हैराण