सोलापूर: उजनी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावल्याने भीमेत सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले होते. मात्र गुरूवारी रात्रीपासून भीमा खोऱ्यासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने उजनीतून पुन्हा पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने दौंडची आवक वाढल्याने भीमेत सतत पाण्याचा विसर्ग होत होता. मात्र मागील दोन दिवसांत आवक घटल्याने उजनीतून नदीत सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले होते. मात्र पुन्हा घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने दौंडची आवक तीस ते चाळीस हजार क्युसेक इतकी होईल, असे गृहीत धरून उजनीतून 2 हजार क्युसेकने सांडवा, तर 1600 क्युसेक पाणी वीज निर्मितीसाठी सोडण्यास शुक्रवारी सकाळी सुरूवात झाली आहे.
नंतर हा विसर्ग दहा हजार व दुपारी चार वाजता 20 हजार क्युसेक करण्यात आला आहे. या पावसाळ्यात उजनी जलाशयावर मात्र केवळ 155 मिलीमीटर इतक्या नीचांकी पावसाची नोंद आहे.