पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 76 लाख 86 हजार मतदार
मुंबई उपनगर दुसऱ्या क्रमांकावर
राज्यात 10 लाख मतदार वाढले
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारांची संख्या वाढत चालली आहे. निवडणूक पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील मतदारांच्या संख्येत तब्बल 10 लाखाने वाढ झाली आहे. त्यामुळे मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 इतकी झाली असून यापैकी सर्वाधिक म्हणजे 76 लाख 86 हजार 636 मतदार एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांची संख्या 72 लाख 26 हजार 826 इतकी झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने 15 जुलै ते 31 आँगस्ट 2019 दरम्यान राज्यभरात पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. लोकसभेला जवळपास 8 कोटी 84 लाख इतक्या मतदारांची नोंद होती. मात्र पुनर्निरीक्षण कार्यक्रमातंर्गत मतदारांची संख्या 10 लाखाने वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 इतकी झाली आहे. यामध्ये 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरूष मतदार तर 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला मतदार आहेत. तसेच तृतीयपंथी म्हणून 2 हजार 593 मतदारांची नोंद झाली आहे.
निवडणूक कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर जिल्ह्यात 25 लाख 4 हजार 367, ठाणे जिल्ह्यात 63 लाख 29 हजार 385, पालघर जिल्ह्यात 19 लाख 36 हजार 141, रायगडमध्ये 22 लाख 65 हजार 478, नाशिकमध्ये 45 लाख 24 हजार 663, अहमदनगरमध्ये 34 लाख 68 हजार 522, सोलापुरात 34 लाख 21 हजार 324, साताऱ्यात 25 लाख 21 हजार 165, कोल्हापुरात 30 लाख 90 हजार 660, सांगलीत 23 लाख 74 हजार 374, रत्नागिरीत 13 लाख 8 हजार 800 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6 लाख 69 हजार 623 इतके मतदार आहेत.