डिकसळ – गेली अनेक वर्षांपासून उजनीचा मासेमारी व्यवसाय राज्य सरकारच्या बेफिकीर नियोजनामुळे लालफितीत अडकला आहे. प्रतीवर्षी एक कोटी मत्स्यबीज सोडणे बंधनकारक असताना मात्र 11 वर्षांपासून मत्स्यबीज सोडले नाही. परिणामी उजनीवर अवलंबून असणाऱ्या मासेमारीचे उत्पादन घटले. याचा विपरित परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मच्छिमार व्यावसाय संकटात सापडला आहे. राज्य शासनाच्या लालफितीला कंटाळून यशवंत सागर जलाशयात (उजनी) पाणलोट क्षेत्रात मच्छीमार व मासे व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने कटला जातीचे 3 लाख मत्स्यबीज बुधवारी (दि,28) भिगवण, पळसदेव, डिकसळ पूल, कुंभारगाव, खानोटा, राजेगाव, इंदापूर कात्रज भागात सोडण्यात आले.
अनेक वर्षांपासून उजनी जलाशयात चुकीची मासेमारी केल्याने अनेक माशांच्या प्रजातीही नष्ट झाल्या होत्या. यावरून स्थानिक मच्छीमार व मासे व्यापारी यांनी स्वखर्चाने मत्स्यबीज सोडण्याचा निर्णय घेतला. यातून पहिल्या टप्प्यात भिगवण, पळसदेव, डिकसळ पूल, कुंभारगाव, खानोटा, राजेगाव, इंदापूर कात्रज भागात 3 लाख मत्स्यबीज सोडण्यात आले. उजनी जलाशयात 11 वर्षांपासून मत्स्यबीजच सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे जलाशयात फक्त काही किरकोळ माशांच्या जातीच शिल्लक राहिल्या आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात चिलापी जातीचाच मासा मोठ्या प्रमाणात आढळत आहे. उजनीत सुरुवातीला आढळणारे प्रामुख्याने वाम, मरळ, कटला, आहेर, बोदवा, शिंगी, मांगूर रोहू, शिंगटा, गुगळी, झिंगा, गवत्या आदी चवदार मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्यासाठी मासेमारांना अनेकवेळा आंदोलने करावी लागली.यासाठी अनेकवेळा पाठपुरावा केला होता. तरी देखील बीज सोडले नाही. मासेमारांनी मस्त्यबीज सोडल्याने मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे.
अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा
उजनी जलाशयात अकरा वर्षांपासून मत्स्यबीज सोडले नाही. यासाठी आंदोलने, मोर्चे काढून संबंधित प्रशासन बधले नाही. चुकीच्या पद्धतीने (वडापाच्या साह्याने) मासेमारी होत आहे. त्यामुळे मत्स्यबीज नष्ट होत आहे. यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनही याकडे प्रशासकडून दुर्लक्ष केले जाते. मात्र, आतातरी अशी मासेमारी बंद होणार का, हा प्रश्न आ वासून उभा आहे.