देशाचा विकास एका दिवसात झालेला नाही
जयपूर – प्रदीर्घ काळ देशाची सत्ता सांभाळलेल्या कॉंग्रेसने लोकशाही मजबूत ठेवली त्यामुळे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होऊ शकले, अशी परखड भूमिका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी मांडली.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कॉंग्रेस नेते असणारे गेहलोत बोलत होते. विकासाच्या मुद्द्यावरून भाजपकडून सातत्याने कॉंग्रेसच्या मागील सरकारांवर टीका केली जाते. त्याचा समाचार घेताना गेहलोत म्हणाले, मोदी पंतप्रधान बनल्यानंतर देशाचा विकास सुरू झाल्याचे म्हणणे अतिशय अयोग्य आहे. देशाचा विकास एका दिवसात झालेला नाही.
देशाच्या विकासाचा पाया पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी रचला. कॉंग्रेसच्या इतर सरकारांनी विकासात मोठे योगदान दिले. राजीव गांधी यांनी माहिती-तंत्रज्ञान क्रांती घडवली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशात संगणक युग आले. त्यांनी पंचायती राज संस्था बळकट केल्या. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या द्रष्ट्या नेत्यांकडून नव्या पिढीने प्रेरणा घ्यायला हवी, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.