गोलंदाजांचा प्रभावी मारा : वेस्ट इंडिज ‘अ’ संघ सर्वबाद 181
कुलिज – भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करीत वेस्ट इंडिज “अ’ संघाचा पहिला डाव 181 धावांमध्ये गुंडाळला आणि या दोन संघांमधील तीन दिवसांच्या क्रिकेट सामन्यात वर्चस्व कायम राखले. पहिल्या डावातील 116 धावांच्या आघाडीसह भारताने दिवसअखेर 200 धावांचे अधिक्क्य मिळविले. पहिल्या डावात 5 बाद 297 धावा करणाऱ्या भारताने दुसऱ्या डावात 1 बाद 84 धावा केल्या.
गोलंदाजांच्या दृष्टीने आगामी कसोटीपूर्वी सरावासाठी हा सामना महत्त्वाचा होता. त्यांच्या इशांत शर्मा, उमेश यादव व कुलदीप यादव यांच्या अचूक माऱ्यापुढे विंडीजच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. केवर्न हॉज, जोनाथन कार्टर व जोहमार हॅमिल्टन यांचा अपवाद वगळता विंडीजचा एकही फलंदाज आत्मविश्वासाने खेळू शकला नाही. हॉजने 8 चौकारांसह 51 धावा केल्या. कार्टरने 26 धावा करताना 2 चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. हॅमिल्टनने 4 चौकारांसह 33 धावा केल्या. इशांतने 21 धावांमध्ये 3 गडी बाद केले तर उमेशने 9 धावांमध्ये 3 विकेट्स घेतल्या. या दोन वेगवान गोलंदाजांना येथील खेळपट्टीवर चांगला टप्पा मिळाला होता. फिरकी गोलंदाज कुलदीपनेही प्रभाव दाखवित 35 धावांमध्ये 3 बळी मिळविले.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. पहिल्या डावाप्रमाणेच या डावातही मयांक अग्रवालने निराशा केली. तो केवळ 13 धावांवर बाद झाला. रोमारिओ शेपर्डने त्याला बाद केले. सलामीस आलेल्या अजिंक्य रहाणेने तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या हनुमा विहारीच्या साथीत 62 धावांची अखंडित भागीदारी केली. रहाणेने 3 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या. विहारीने नाबाद 48 धावा करताना 6 चौकार व 1 षटकार अशी फटकेबाजी केली.
संक्षिप्त धावफलक –
भारत : पहिला डाव 5 बाद 297 धावा (घोषित) व दुसरा डाव 1 बाद 84 (अजिंक्य रहाणे नाबाद 20, हनुमा विहारी नाबाद 48) वेस्ट इंडिज ‘अ’ : पहिला डाव 56.1 षटकांत सर्वबाद 181 (केवर्न हॉज 51, जोनाथन कार्टर 26. जोहमार हॅमिल्टन 33, इशांत शर्मा 3-21, उमेश यादव 3-19, कुलदीप यादव 3-35)