बारामती, पुरंदर विधानसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना देणार आव्हान
जिल्हा प्रतिनिधी
पुणे- पुणे जिल्ह्यातील काही मतदारसंघाकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरक्षित बालेकिल्ले म्हणून पाहिले जात होते. परंतु, लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची पुरती दमछाक झाली. आता, विधानसभा निवडणुकीत एकसंध नेतृत्त्वाचा अभाव तसेच इच्छुकांची वाढत असलेली संख्या पाहता राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लोकसभेपेक्षाही जास्त दमछाक होणार आहे. आघाडीचा मुद्दा अजूनही चर्चेतच असल्याने आणि भाजप तसेच शिवसेनेसह अन्य पक्षांनी विधानसभेची जय्यत तयीार केल्याने आपापल्या मतदार संघातील पक्षाची मतं राखण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे असणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचा पाया असलेल्या बारामतीचा विचार केला तर गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले आहे. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने पवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, बारामतीत पवार कुटुंबियांचा पराभव करणे कोणालाच शक्य नाही. हे त्यावेळी स्पष्ट झाले होते. यावेळी तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच पवार यांचा बारामतीत पराभव करता येणे अवघड असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, कदाचीत पवार यांना गाफील ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. कारण, राष्ट्रवादी पक्ष एक दिसत असला तरी तो एकसंघ नाही कारण, पक्षाला तिन नेतृत्त्व असल्याचे मानले जाते. ही बाब खरी किंवा खोटी, हा मुद्दा केवळ चर्चेचा असला तरी राष्ट्रवादीतून झालेली आऊट गोईंग पाहता यामधील तथ्य नाकारता येणार नाही. यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर परिणाम होत आहे. यामुळेच उडालेल्या कवळ्यांचा नाही तर राहिलेल्या मावळ्यांचा विचार करा, असे आवाहन पक्षाध्यक्ष शरद पवार यांना सातत्याने करावे लागत आहे.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काही आणि कॉंग्रेसचे काही नेते भाजप-शिवसेनेत गेले आहेत, तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत. याचाही फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. बारामती बालेकिल्याचे जास्तीत जास्त बुरूज ढासळणार नाहीत, याची काळजी अजित पवार घेत असले तरी पडद्यामागील हालचाली वेगळ्या असल्याचा दावाही भाजपकडून केला जात आहे.
पुरंदरमध्ये राज्यमंत्री, विद्यमान आमदार विजय शिवतारे यांना शिवसेनेकडून उमेदवारी निश्चितच आहे. तर आघाडीच्या मुद्यावर एकमत होत नसल्याने शिवतारे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाही. मात्र, शिवसेनेच्या विरोधात यावेळी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली मोट बांधली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून उमेदवारीची अपेक्षा असलेले संभाजीराव झेंडे हे एकमेव इच्छुक दिसत आहेत. तर, मातब्बर मानले जाणारे अनेक जण शांतच असल्याने पुरंदरमध्ये सध्या तरी शिवसेना विरोधात कॉंग्रेस असेच चित्र दिसत आहे कॉंग्रेस पक्षाशी आघाडी झाली आणि नाही झाली तरी युवा नेते संजय जगताप यांनी जोरदार तयारी ठेवली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाबा जाधवराव यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे
- शिवतारे यांच्या त्रुटींचा समाचार…
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या वादात गेल्या विधानसभेच्या (2014) वेळी पुरंदमधील मतदारांनी सुवर्णमध्य म्हणून विजय शिवतारे यांना निवडून दिले होते. आज, शिवतारे हे पुरंदर तालुक्याचे आमदारच नव्हे तर राज्यमंत्री आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या पंक्तीत त्यांना मानाचे स्थान आहे. तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असले तरी गुंजवणीबाबतचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आहे. विमानतळाची उभारणीही त्यांच्या बाजूने झुकणारी असली तरी त्यांच्या विरोधात एक गट सक्रीय आहेच. याशिवाय पुरंदर उपसा, जनाई-शिरसाई पाणी योजनेसह पुणे-जेजुरी रस्ता रूंदीकरण आदी प्रश्नांवरून शिवतारे यांच्या त्रुटींचा समाचार विरोधी उमेदवार घेऊ शकतात. - पवार यांनी गाफिल राहू नये…
बारामती विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांच्याकरीता सुरक्षित असल्याचे मानले जात असले तरी तालुक्यातील 22 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यात गेल्या पाच वर्षात आलेले अपयश, बारामती औद्योगिक वसाहतीतून अनेक उद्योग बाहेर तसेच काही बंद असल्याने वाढलेली बेरोजगारी यासह आरक्षण मुद्यावरून धनगर समाजात राष्ट्रवादी विषयी सुरूवातीपासून असलेली नाराजी हे मुद्दे पवार यांना काहीसे अडचणीचे ठरू शकतात. त्यातही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिला तसेच अन्य पक्षांच्या उमेदवारांचे आव्हान असेल तर पवार यांचे बारामतीतील मताधिक्य कमी होऊ शकते. युामळे पवार यांनाही गाफिल राहून चालणार नसल्याचे सांगितले जात आहे.