माजी खासदार पटोले यांचा आरोप
कराड – सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीचा हवामान खात्याने यापूर्वीच इशारा दिला होता. मात्र निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला प्राधान्य दिले. मात्र दुसऱ्या बाजुला महापुराच्या संकटाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे जिवीतहानीसह बेसुमार वित्तहानीची घटना घडलेली आहे. याला केवळ फडणवीस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप अखिल भारतीय कॉंग्रेस किसान सेलचे अध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केला.
सोमवारी माजी खासदार नाना पटोले यांनी कराडला भेट देत येथील पूरस्थितीची पाहणी केली. तसेच पूराचे पाण्याखाली सापडलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळास भेट देत स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन केले. नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असून काही जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. याची सूचना सुद्धा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने दिली होती. त्याप्रमाणे कॉंग्रेसने देखील ही माहिती मुख्य सचिवांना दिली होती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारासाठी निवडणुका सुरू झाल्या प्रमाणे व्यस्त होते. त्यांनी जनतेच्या पैशाने राज्यत महाजनादेश यात्रा सुरू केली.
त्यामुळे सातारा, सांगली ,कोल्हापूर येथील पूर परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा ,सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला भोगावा लागला. या महापूराची सगळी जबाबदारी सरकारची आहे. हा आरोपच नाही तर ही वस्तुस्थिती आहे.
यावेळी आमदार आनंदराव पाटील, सातारा जिल्हा निरीक्षक संजय बालुगडे, अशोकराव पाटील, कराड शहर अध्यक्ष राजेंद्र माने, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, सातारा जिल्हा अल्पसंख्यांक कॉंग्रेसचे अध्यक्ष झाकीर पठाण, उद्योजक उदय थोरात, युवा नेते प्रतापसिंह पाटील, पाटण तालुका युवक कॉंगेस अध्यक्ष गिरीश पाटील, सातारा जिल्हा कॉंग्रेस चे सचिव धैर्यशिल सुपले, प्रशांत देशमुख, सुधीर शिंदे, प्रसाद रैनाक, अनिल पाटील, मारुती जाधव व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, माजी खासदार नाना पटोले यांनी कराडमधील पूर परिस्थीतीची पाहणी केल्यानंतर ते सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.