पावसाचा जोर कायम असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
डेंग्यु, मलेरिया, टायफॉइड यासारख्या आजाराच्या तापाने थैमान घातले असून सरकारी व खासगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल झाले आहेत. मागील पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पाऊस उघडत नसल्याने सूर्य प्रकाशही पडत नाही. सर्वत्र चिखल आणि दलदल निर्माण झाली असून डास व इतर किटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक आजारी पडत आहेत.
सर्वत्रच पाऊस सुरू असल्याने रोगराईवर नियंत्रण मिळविण्यासाठी धुरळणी किंवा इतर मार्गाने डासांचा प्रतिबंध करणे शक्य होत नाही. प्रशासनाच्या वतीने कुठलीही प्रतिबंधात्मक लस नागरिकांना दिली जात नाही. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सरकारी दवाखाने आणि खासगी हॉस्पिटल रुग्णांनी फुल आहेत. रोगराईमुळे आजार दूर करण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड बसत आहे.गावांमधील पिण्याच्या पाण्याचे जलस्त्रोत तसेच घरातील पाण्याचे जलस्त्रोत पावसाच्या पाण्यामुळे खराब झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. गटारेही पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरली आहेत. गटारांतील आणि खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गटारात साचलेले पाणी काढून देणे गरजेचे आहे.