आठवडा झाला तरी
टाकवे बुद्रुक – आंदर मावळातील 40 गावांच्या दळणवळणाचा मुख्य मार्ग असलेल्या ब्रिटिश कालीन इंद्रायणी नदीवरील पुलाची झालेल्या दयनीय झाली आहे. या स्थितीमुळे मागील आठवड्यात घडलेल्या मोटार अपघाताच्या घटनेमुळे पुलाचा स्थितीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आठवडा पूर्ण असला तरीही प्रशासनाने मात्र कोणताही बोध घेतल्याचे दिसून आले नाही. ज्या कारणामुळे अपघात घडला, त्या खुणा अद्यापही कायम आहेत. अपघाताला मुख्य कारण समजल्या जाणाऱ्या खड्ड्यांची अवस्था अद्यापही दयनीय झाली आहे. एकही खड्डा बुजवण्यात आलेला नाही. ज्या ठिकाणी मोटार अपघात झाल्याने सुरक्षारक्षक कठडे तुटले, त्या ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी केली आहे.
आंदर मावळात जाण्यासाठी मुख्य मार्ग असल्याने पुलावरून औद्योगिक वसाहतीमधील मालवाहतूक, कामगार बस, तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बस, प्रवासी वाहतूक याची याठिकाणाहून जाण्यासाठी वर्दळ असते. पुन्हा कुठल्याही प्रकारची अशी अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आंदर मावळातील नागरिकांनी केली आहे. तत्पूर्वी या घटनेला प्रशासनाची दिरंगाई असून, सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांचा तीव्र शब्दांत सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
मावळ परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने संबंधित काम करण्यास सातत्याने व्यत्यय येत आहे. येत्या दोन दिवसांत पुलावरील खड्डे व सुरक्षारक्षक कठडे बसविण्याचे काम हाती घेतले जाईल.
– राकेश सोनावणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.