नवी दिल्ली : देशातील अवैध वाळु उपसा प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून या प्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकार, पाच राज्य आणि सीबीआयला नोटीस बजावली आहे. यात न्यायालयाने देशातील अवैध वाळु उपसा रोखण्यासाठी पावले उचलणे आणि त्यावर नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
न्यायामुर्ती एस.ए.बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. या प्रकरणात महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांसह न्यायालयाने केंद्र आणि सीबीआयला नोटीस बजावून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आदेश दिले आहेत. अवैध वाळु उपसा केल्याने पर्यावरणात नुकसान पोहचत असल्याची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी करण्यात आली. याचिकेत या प्रकरणी सीबीआयने संबंधित ठिकाणी गुन्हे दाखल करून याची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत असे म्हटले होते. त्यावरच न्यायालयाने सीबीआयला देखील या प्रकरणी नोटीस बजावले आहे.