अपघाताला आमंत्रण : 13 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी हीच स्थिती
आंबेठाण – चाकण ते भांबोली फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. यामध्ये भांबोली परिसरात गाडलेल्या मोऱ्यांचा भराव वाहून गेल्याने रस्त्यावर मोठे भगदाड पडले असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणासह अन्य ठिकाणी प्रलंबित असणाऱ्या मोऱ्यांच्या ठिकाणी तत्काळ पक्के बांधकाम करून पुन्हा भराव वाहणार नाही याची काळजी घ्यावी आणि प्रवाशाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
चाकण ते भांबोली फाटा या जवळपास 13 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सध्या हायब्रीड ऍम्युनिटी योजनेअंतर्गत रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी सिमेंटच्या मोऱ्या गाडण्यात आल्या आहेत; परंतु या मोऱ्या गाडल्यानंतर भराव वाहून जाऊ नये यासाठी आवश्यक असणारे पक्के बांधकाम किंवा सिमेंट कॉंक्रिटीकरणचा भराव दोन ते तीन महिने उलटून गेले तरी केला गेला नाही, त्यामुळे मागच्या आठवड्यात सुरू झालेल्या पावसाने मोऱ्यांचा भराव वाहून गेला असून रस्ता कोरला गेला आहे. आधीच रस्ता अरुंद आणि त्यात भराव वाहून गेल्याने त्या ठिकाणाहून एका वेळी दोन वाहने प्रवास करू शकत नाही. त्यामुळे तत्काळ या ठिकाणी पुन्हा भराव करून त्यांच्या दोन्ही बाजूनी पक्के बांधकाम करावे अशी मागणी केली जात आहे.