मुंबईतील एकूण आमदारांची संख्या 15
मुंबई- कर्नाटकातील कॉंग्रेसचे आणखी एक आमदार आज मुंबईमध्ये दाखल झाले. सभापतींकडे 10 जुलै रोजी आपला राजीनामा देणारे एमटीबी नागराज आज दुपारी मुंबईमध्ये आले. त्यामुळे बंडखोर आमदारांची संख्या आता 15 झाली आहे.
अन्य बंडखोर आमदार जेथे मुक्कामी आहेत, त्या हॉटेलवर भाज्पचे नेते आर. अशोक यांच्या समवेत नागराज पोहोचले आहेत. असे सूत्रांनी सांगितले. कॉंग्रेस आणि निजद आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी नागराज यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. चिक्काबल्लापूरचे आमदार के. सुधाकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर नागराज यांनी आपला राजीनामा मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. सुधाकर आणि नागराज दोघांनीही 10 जुलैरोजी एकत्रितपणे राजीनामे दिले होते.
सुधाकर यांनी आपला फोन बंद ठेवला आहे. गेल्या 2 दिवसांपासून ते उपलब्ध नाहीत. सुधाकर आणि आपण दोघांनी एकत्रच राजीनामे दिले होते. त्यामुळे आम्ही एकत्रच राहणार आहोत. सुधाकर यांची समजूत घालून परत आणण्याचा आपण प्रयत्न करू, असे आपण कॉंग्रेसच्या नेत्यांना कळवले असल्याचे नागराज यांनी बेंगळूरुमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
कॉंग्रेसचे 13 आणि निजदचे 3 अशा 16 आमदारांच्या राजीनाम्यामुळे कुमारस्वामी सरकार अडचणीत आले आहे. या 16 जणांव्यतिरिक्त 2 अपक्ष आमदारांनीही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि भाजपला पाठिंबा दिला आहे. 224 सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेमध्ये कॉंग्रेस-निजद अघडीकडे 116 तर भाजपकडे 107 अमदारांचे संख्याबळ आहे. बंडखोर 16 आमदारांचे राजीनामे मंजूर झाले तर आघाडीचे संख्याबळ 100 होईल. अशावेळी सभापतींचे मत महत्वाचे असेल.