नवी दिल्ली – सरकारने ठरविल्याप्रमाणे जर सन 2025 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलर्सची झाली तर भारत जपानला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे.
आयएचएस मार्कीट या संस्थेने जारी केलेल्या माहितीनुसार 2019 अखेरीस भारत पाचव्या क्रमांकावरील ब्रिटनची जागा घेणार आहे. भारताला ती जागा भारतीय अर्थव्यवस्था तीन लाख कोटी डॉलरची झाल्यानंतर मिळेल. याच प्रमाणात भारतातील ग्राहकांची बाजारपेठही मोठी होणार आहे. त्यामुळे जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचे भारतीय बाजारपेठेकडे लक्ष आहे असे ही या संस्थेने म्हटले आहे.
मात्र यासाठी भारताला देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच निर्यात पेठेकडेही लक्ष केंद्रीत करावे लागेल. आगामी काळात निर्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याशिवाय भारताचे राष्ट्रीय उत्पन्न अपेक्षेइतके वेगाने वाढणार नाही.