कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यामागील स्थिती
मंजूर निधीवर पाणी फिरले
शहरातील भविष्यात होणारी पार्किंगची समस्या लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे प्रशस्त पार्किंग इमारतीसाठी निधी दिला. मात्र पालिकेतील काही नगरसेवकांच्या अंतर्गत कुरघोडीमुळे या प्रकल्पावर पाणी फेरले गेले. आज ही जागा आजाराचे भांडार बनू लागले आहे. नगरसेवकांनी जबाबदारीने यात राजकारण न करता जर हा प्रकल्प होऊ दिला असता, तर येथे आज कचऱ्याच्या डबक्या ऐवजी प्रशस्त अशी पार्किंग इमारत कराडरांच्या सेवेत दिसली असती.
कराड – स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर कराड नगरपालिकेचे स्वच्छतेत पूर्वीसारखे लक्ष राहिले नाही. येथील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा पाठीमागील जागेत पावसाचे पाणी व कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. या साचलेल्या पाण्यामुळे भविष्यात डेंग्यूची साथ पसरण्याची शक्यता आहे. पालिकेने आजवर या ठिकाणी अपेक्षित लक्ष न दिल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर या पाण्याचा निचरा करून ही जागा स्वच्छ करावी, अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांमधून होत आहे.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात बसस्थानक जवळील पार्किंगसाठी ती जागा निवडली होती. त्या जागेत प्रशस्त पार्किंग इमारत उभारण्यासाठी त्यांनी भरभरून निधी टाकला. मात्र नगरसेवकांच्या अंतर्गत कुरघोडीमुळे हा पार्किंगचा प्रकल्प रद्द झाला. यासाठी आलेला निधीही परत गेला.
आता या मोकळ्या जागेत गेली पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी साचले आहे.आधीपासूनच या जागेत प्रचंड कचरा टाकला जात असल्याने या जागेला उकिरड्याचे स्वरूप आले होते. आता पावसामुळे येथील जागेत पाणी साचत आहे. कचरा व पावसाचे पाणी यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत असून डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होण्यास अनुकूल परिस्थिती याठिकाणी झाली आहे.
भविष्यात कराडमध्ये डेंग्यूची साथ पसरल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न परिसरातील नागरिक पालिकेला विचारू लागले आहेत. या परिसरातच अनेक खाद्यपदार्थाचे स्टॉल असल्याने येथील उकिरडा सदृश जागेवरील माशा व डास खाद्यपदार्थावर बसत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक व ग्राहक त्रस्त झाले आहेत.
या जागेतील साचलेला कचरा पालिकेने त्वरित काढून पाण्याचा निचरा करण्यासाठी तेथील जागा भरून घेणे गरजेचे आहे. नाहीतर तो मोठा खड्डा भविष्यात कचऱ्यानेच व्यापला जाईल आणि याठिकाणी पूर्वीच्या बाराडबरी सारखी परिस्थिती शहरामध्ये निर्माण होईल. ही होऊ नये याची खबरदारी पालिकेने घेतली पाहिजे. फक्त स्वच्छ भारत अभियान मध्ये अव्वल क्रमांक येऊन काही होत नसतं, त्यासाठी शहराच्या स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवणे तितकेच गरजेचे आहे, असाही सूर नागरिकांतून उमटत आहे.