पालिका हद्दीतील अनधिकृत गोष्टींकडे बोट
पालिका म्हणते, “ही जबाबदारी आमची नाही’
पुणे – खडकवासला धरण भरल्यामुळे सुरूवातीला मुठा उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर मुठा नदीप्रवाहात पाणी सोडण्यात आले. कालवा फुटण्याचा प्रकार घडल्याने जलसंपदा विभागाकडून पावसाळ्याआधीच कालव्याची दुरुस्ती, गाळ काढणे आणि गळती रोखण्याची कामे करण्यात आली आहेत. मात्र, या व्यतिरिक्त महापालिका हद्दीतील अनधिकृत गोष्टींमुळे जर कालवा फुटला, तर त्याला महापालिकाच जबाबदार असे सांगत जलसंपदा विभागाने स्वत:वरील जबाबदारी झटकून टाकली आहे.
मुठा कालवा फुटून झालेल्या जलप्रलयानंतर जलसंपदा विभागाने “आजूबाजूच्या अतिक्रमणांमुळे, खेकडे, उंदीर घुशींमुळे कालवा फुटला,’ असा अहवाल दिला होता. याशिवाय कालव्याच्या बाजूला वाढलेल्या झोपडपट्टीमुळे तेथे पक्के रस्ते बांधण्यात आले. त्यावरून वाहतूक सुरू झाली. रस्ते पक्के बांधले, परंतु त्याच्या खाली कालव्याचा भराव मातीचा आहे. त्या रस्त्यांवरून होणारी वाहतूक लक्षात घेता ती माती खचत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना आणखीही घडू शकतात, असे जलसंपदा खात्याने त्यावेळी अहवालात नमूद केले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कालवा फुटला तर त्याला सर्वस्वी महापालिकेलाच जबाबदार धरले जाणार आहे.
महापालिकेकडून कामे करून घेणे अनुचित
महापालिकेमार्फत टाकण्यात आलेल्या 2200 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या कामामध्ये संरक्षक भिंत बांधण्याचा विषय जलसंपदा विभागाने दि.6 जुलैच्या पत्रात नमूद केला आहे. ही दाबनलिका टाकत असताना संपूर्ण जलवाहिनीभोवती स्टील जाळी टाकून “पाईप इन्केस’ करण्यात आले आहे. यामुळे कालव्याच्या सुरक्षिततेला जलवाहिनी टाकल्यामुळे कोणताही धोका नाही, असे पत्रात नमूद केले आहे. असे असले, तरी पाटबंधारे विभागामार्फत या कालव्याची दुरुस्ती न केल्यामुळे पाण्याच्या बाजूला कालव्याची भिंत अथवा भराव खचून कालव्यामध्ये पडल्याचे ठिकठिकाणी निदर्शनाला येते. वास्तविक, कालव्यातील पाण्याची बाजू सुरक्षित ठेवणे ही पूर्णपणे पाटबंधारे विभागाची जबाबदारी असून, कालवा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पुणे महापालिकेकडून कामे करून घेणे हे अनुचित आहे. आपणामार्फतच ही कामे करण्यात यावीत, असेही महापालिकेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी पत्राद्वारे ठामपणे सांगितले आहे.